मुंबईः अर्थसंकल्पावर मत मांडत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना एका प्रसिद्ध गाण्याच्या ओळींची आठवण करुन देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोला हाणला. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, ह्या ओळी म्हणत जयंत पाटील यांनी फडणवीस यांना चिमटा काढला.
जयंत पाटील म्हणाले, फडणवीस यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ पडली तेव्हा त्यांचा चेहरा बघण्यासारखा होता. त्यावेळी त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव लपवता आले नाही. मात्र आता त्यांना त्याची सवय झाली आहे. ते दुःख लपवायला शिकले आहेत. आता ते हसतात. तरीही त्यांच्याकडे बघून मला आठवत असलेल्या एका गाण्याच्या ओळी मी सर्वांसमोर मांडतो. कारण हा शेवटा अर्थसंकल्प असा समजूनच तो मांडण्यात आला आहे. त्यामुळे क्या गम है, क्या दिखा रहे हो, असेच आता म्हणावे लागले, असा टोला जयंत पाटील यांनी फडणवीस यांना हाणला.
सत्ता बदल झाला तेव्हा असं वाटलं होतं की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील. पण तसे काही झाले नाही. अचानक एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. तेव्हा देवेंद्र फडणवीसांची इच्छा होती की,क किंग नाही झालो तर किंग मेकर तरी होऊच. पण आता बघितले तर किंगमेकर दिल्लीत बसले आहेत. इकडे आपल्या हातात फारसे राहिले नाही. सगळे काही दोन नंबरच्या हातात आहे. त्यामुळे ‘क्या हाल है क्या दिखा रहे हो’ ही ओळ सगळ्यात महत्त्वाची आहे, असे जयंत पाटील म्हणाले.
आता तुम्ही सर्वांनी दिल्लीच्या वाऱ्या सुरु केल्या आहेत. कारण येथे मंत्रिमंडळ विस्ताराची काही चिन्हे नाहीत. कदाचित दिल्लीत जाऊनच काही तरी पदरी पडेल, असे तुम्हा सर्वांना वाटतं आहे. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. मात्र तुम्ही दिलेल्या आश्वासनांना जनता आता भुलणार नाही, असा दावा करत जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.