केंद्रातील मोदी सरकारला सत्तेत येऊन ७ वर्षांचा कालावधी नुकताच पुर्ण झाला आहे. केंद्र सरकारने ७ वर्षांत आपल्या कामगिरीत अपयश मिळाले असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर काँग्रेसने राज्यात निदर्शनेही केली होती. १ जून – २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील भारताचा विकास दर उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्रसरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशाचा विकासदर घसरणे ही गेल्या ४० वर्षांमधील निराशाजनक कामगिरी असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया देताना मोदीसरकारचे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी नियोजन नाही… पेट्रोल-डिझेलचे भाव आवाक्याबाहेर जात आहेत… देशाचा जीडीपी मायनसमध्ये आहे… महागाईचा नुसता भडका उडाला आहे असा कामांच्याबाबतीचा पाढाच वाचला आहे. तर केंद्रातील मोदी सरकारने जनतेला या रुपात रिटर्न गिफ्ट दिले आहे असे स्पष्ट केले.
कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी नियोजन नाही, पेट्रोल-डिझेलचे भाव आवाक्याबाहेर जात आहेत, देशाचा जिडीपी मायनसमध्ये आहे, महागाईचा नुसता भडका उडला आहे. जनतेने दोनदा निवडून दिल्यावर केंद्र सरकारने जनतेला दिलेले हे रिटर्न गिफ्ट आहे. pic.twitter.com/nRQveVolFo
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 1, 2021
सोमवारी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतीय अर्थव्यवस्थेने गेल्या ४० वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली आहे. कोरोनाच्या संकटाने मोठा तडाखा बसलेल्या भारताचा २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील विकासदर (सकल राष्ट्रीय उत्पादन) उणे (-) ७.३ टक्के नोंदवला गेलाय. चाळीस वर्षांपूर्वी म्हणजे १९७९-८० या वर्षांत आर्थिक विकासदराची उणे ५.२ टक्के घसरण झाली होती. त्यानंतर प्रथमच विकासदर उणे ७.३ टक्क्य़ांवर घसरला आहे.