जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काही दिवसांपुर्वी मराठवाडा विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर तोडगासुद्धा काढला आहे. निम्न पैनगंगा धरणातून १६७.४६ टीएमसी पाणी वापर करण्यास दिलेल्या निर्णयाच्या माध्यमातून मराठवाड्यातील नागरिकांना दिलासा देण्याचे काम महाविकास आघाडीने केले. मराठवाड्यात अधिक समृद्धी येण्यासाठी ज्या गोष्टी करता येईल त्या गोष्टी येत्या काळात राज्यसरकारच्या जलसंपदा विभागामार्फत केल्या जातील असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहे.
गोदावरी पाणी तंटा लवादामध्ये निम्न पैनगंगा धरणापर्यंतचे पाणी वापरण्यास पूर्ण मुभा आहे. तथापि आंध्रप्रदेशशी झालेल्या विविध बैठकांमध्ये पैनगंगेत ११७.८७ टीएमसी पाणी आहे. असे गृहीत धरून चर्चा केली जात होती. जलविज्ञान कार्यालयाचे मुख्य अभियंता यांनी केलेल्या अभ्यासानुसार निम्न पैनगंगा धरणापर्यंत ११७.८७ ऐवजी १६७.४६ टीएमसी पाणी उपलब्ध होते म्हणून संपूर्ण १६७.४६ टीएमसी पाणी वापर करण्यास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मान्यता दिली.
मी मराठवाड्यातील विविध भागात दौरा केला. नागरिकांच्या पाण्याच्या समस्या जाणून घेतल्या. जल विज्ञान कार्यालयाचे मुख्य अभियंता यांनी केलेल्या अभ्यासानुसार निम्न पैनगंगा धरणापर्यंत ११७.८७ ऐवजी १६७.४६टीएमसी पाणी उपलब्ध होते म्हणून संपूर्ण १६७.४६टीएमसी पाणी वापर करण्यास आज मान्यता दिली.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) November 11, 2021
या पाण्याचा वापर पैनगंगा उपखोऱ्यात प्राधान्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील प्रत्यक्ष तुट भरून काढण्यासाठी व उर्वरित पाणी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या निम्न भागात वापरण्यात येऊ शकेल. याचा फायदा हिंगोली, यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांना होणार आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.
मंजूर अतिरिक्त पाण्याचा वापर, नियोजन पुस, अरूणावती व उर्ध्व पैनगंगा या प्रकल्पांच्या खालील भागात प्राधान्याने करण्यात येणार आहे. या मान्यतेनुसार, उर्ध्व पैनगंगा ते निम्न पैनगंगामधील क्षेत्रामध्ये सुमारे ४४.५४ टीएमसी पाणी पुढील नियोजनासाठी उपलब्ध होणार आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आज होणार शस्त्रक्रिया, CMO देणार हेल्थ बुलेटिन