राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या अद्याप केल्या नाहीत. राज्य सरकारने राज्यपालांना १२ सदस्यांच्या नावाची फाईल पाठवून ६ ते ७ महिन्यांचा कालावधी पुर्ण झाला आहे. परंतु अद्याप या फाईलवर राज्यपालांनी सही केली नाही. यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते उघडपणे टीका करत आहेत. १२ आमदारांच्या नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. राज्यपालांच्या भूमिकेवरही जंयत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत वेळोवेळी राज्यसरकारने राज्यपालांना आठवण करून दिली आहे त्यामुळे नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. सातारा येथे पत्रकारांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत प्रश्न केला असता जयंत पाटील यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
देशात आणि राज्यात आमदारांच्या नियुक्त्या रखडवून ठेवण्याचा अशाप्रकारचा अनुभव कधी आला नाही. राज्य सरकारने एखादी गोष्ट शिफारस केल्यानंतर इतक्या प्रचंड प्रलंबाने त्याच्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. इतका विलंब का लागतोय असा प्रश्नही जयंत पाटील यांनी केला आहे. आमच्या पध्दतीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पाठवल्या आहेत. मात्र प्रलंबित नियुक्त्या राज्यपालाकडून रखडल्या आहेत. राज्यसरकारचा शिफारशी करण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराला निर्णय न घेतल्यामुळे अधिकारावर गदा येतेय का? हा खरा प्रश्न आहे असेही जयंत पाटील म्हणाले.
..तर तुमचा योग्य सन्मान करु
जागतिक पातळीवर विविध स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवणाऱ्या अपंग खेळाडूंचा मागील सरकारने यथोचित सन्मान केला नाही, अशी खंत सोलापूरातील करमाळा तालुक्यातील दिव्यांग जलतरणपटू सुयश यांनी बोलून दाखवली. आपण टोकियो पॅराऑलिम्पिक २०२१ मध्ये चांगले यश मिळवल्यास शासनातर्फे योग्य सन्मान केला जाईल,असे सर्वांच्या वतीने जयंत पाटील यांनी आश्वासित केले आहे. शारीरिक आव्हानांवर मात करत सुयशने मिळवलेले हे यश खूपच कौतुकास्पद आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने सुयश जाधव यांना पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जयंत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सोलापूरातील करमाळा तालुक्यातील दिव्यांग जलतरणपटू यांच्याशी जयंत पाटील यांनी व्हीसीद्वारे संवाद साधला. सुयश यांचे नाव टोकियो पॅराऑलिम्पिक २०२१ स्पर्धेसाठी भारताच्या वतीने निश्चित झाल्याचे वर्तमानपत्रातून समजले असून अपंगत्वावर मात करत महाराष्ट्राचं नाव मोठं करणाऱ्या सुयशला जयंत पाटील यांनी संवाद साधला.