राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मर्जीतले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील डॅशिंग नेते राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आता आणखी एक नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य सरकारने सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोपवली असून, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडील सोलापूर जिल्ह्याच्या पालक मंत्री पदाचा पदभार काढून घेतला आहे. यासंदर्भात शासन आदेशही तातडीने जारी करण्यात आला आहे.
म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्याकडे दिली जबाबदारी
महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे कामगार मंत्री दिलीप वळसे –पाटील यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र सोलापूरचे पालकमंत्री पद सोपविल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी फारसे लक्ष देता येत नव्हते. त्यातच कोरोना आजारामुळे राज्यातील असंघटीत कामगार, बांधकाम कामगारांच्या प्रश्नाकडे सातत्याने लक्ष देणे गरजेचे बनल्याने त्यांच्याकडील सोलापूरचे पालकमंत्री पद काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सध्या गृहनिर्माण खाते असून, ते सध्या चांगलेच सक्रिय आहेत यामुळे त्याच्याकडे ही नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे.