केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तरांच्या तासांत मोठं आश्वासन दिलं होतं. अवघ्या दोन वर्षांत देशातील रस्ते अमेरिकेसारखे होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली निधीची कमतरता नाही, असं नितीन गडकरी म्हणाले होते. दरम्यान, सरकार कर्ज देण्यास असमर्थ असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ते विकायला काढलेत अशी खबर आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत रस्त्याबाबत आणि टोलबाबत त्यांनी नितीन गडकरींना एकप्रकारे आठवण करून दिलीय. सरकारने आणखी कर्ज द्यायला असमर्थ आहे असं सांगितल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ते विकायला काढलेत अशी खबर आहे. २०१४ साली २४,००० कोटी रुपये कर्ज होतं. आता ते ३.४८ लाख कोटी रुपये झालंय. टोलधाडी आता वाढतील. संपण्याची शक्यता नाहीच! उधारीवर ताजमहल घ्यायला मला पण आवडेल, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
सरकारने आणखी कर्ज द्यायला असमर्थ आहे असं सांगितल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ते विकायला काढलेत अशी खबर आहे. २०१४ साली २४,००० कोटी रुपये कर्ज होतं. आता ते ३.४८ लाख कोटी रुपये झालंय.
टोलधाडी आता वढतील. संपण्याची शक्यता नाहीच!
उधारीवर ताज महल घ्यायला मला पण आवडेल
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 8, 2023
नितीन गडकरी यांनी २०२४ पर्यंत भारतातील पायाभूत सुविधा युनायटेड स्टेट्स सारख्या चांगल्या असतील असे आश्वासन दिले होते. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) कडे निधीची कमतरता नाही आणि आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आहे, असा दावा गडकरींनी केला होता.
सरकार येत्या ३ वर्षात देशात २६ हरित द्रुतगती मार्ग बनवण्याचा विचार करत आहे. दिल्ली ते डेहराडून, हरिद्वार किंवा जयपूरपर्यंत फक्त दोन तासांत प्रवास करता येईल. या प्रवासात लागणाऱ्या अंदाजाच्या वेळेची माहितीही गडकरींनी दिली आहे.
हेही वाचा : ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही, जगताप यांच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर नाना पटोलेंचा संताप