महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावरून दोन्ही राज्याचे सरकार चांगलेच आक्रमक झाले आहेत. परंतु कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसची तोडफोड करण्यात आली असून या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना इशारा दिला आहे. जर तुम्ही आमच्या बस फोडाल तर आम्ही तुमच्या बस फोडू शकत नाही का?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेले असताना जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, जर तुम्ही आमच्या बस फोडाल तर आम्ही तुमच्या बस फोडू शकत नाही का?, संपूर्ण कर्नाटकात जर मराठी माणसांचं प्रमाण पाहिलं तर २५ टक्के आहे, १०० टक्के तर येथेच आहेत. बंगळुरुपेक्षा अधिक लोक तर मुंबईत आहेत. आम्ही त्यांना सांभाळून घेतो. आमचा मराठी माणूसच त्यांचा इडली डोसा खायला जातो. त्यामुळं हे आपलेपण बोम्मईंना तोडायचं आहे का?, असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.
एव्हाना पंतप्रधानांनी बोम्मईंना सांगायला हवं होतं की, शांत बसा. एवढं आक्रमक होण्याची गरज नाही. हा वाद आजचा नाही १९४६ पासून सुरु आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दावा दाखल आहे, असं असताना एका राज्याचे मुख्यमंत्री असं कसं बोलू शकतात. खटला सुरु असताना तुम्ही असं विधान करणं चुकीचं आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
महाराष्ट्रातला प्रत्येक मराठी माणूस तिथं आहे हे दाखवून देणं सरकारचं काम आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामार्फतच राज्यांची पुनर्रचना झाली. भाषावर प्रांत रचना १९५६ मध्ये झाली. त्यानुसार महाराष्ट्रात पहिल्यांदा जे आंदोलन झालं ते मराठी साहित्य संमेलनात झालं होतं. त्याचे अध्यक्ष होते जत्रम माडगुळकर. त्यांनी ठराव केला होता की, बिदरी, भालकी, कारवार, बेळगाव आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, असं आव्हाड म्हणाले.
हेही वाचा : नागपूर हिवाळी अधिवेशनासाठी आता खास मोबाईल