ज्युनिअर केजीमध्ये शिकणार्या साडेचार वर्षांच्या हर्षिता भोईर हिने अवघड समजल्या जाणारे कळसुबाई शिखर चढून जाण्याची किमया साधली आहे. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्ने याची नोंद घेतली आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या अलिबाग विभागाचे सदस्य कविराज भोईर यांची ती कन्या असून, नेरूळच्या रॅन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ती शिकत आहे.
मुलीच्या या धाडसाबद्दल बोलताना भोईर म्हणाले, वर्षभरापूर्वी तिला रायगड किल्ल्यावर नेले तेव्हा खांद्यावर उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती स्वतः चालत सर्वांपुढे गडावर पोहचली. तिची पुन्हा एकदा परीक्षा करूया म्हणून पुढच्या महिन्यात कर्नाळा किल्ल्यावर नेले असता तिने सर्वांनाच थक्क करून सोडले. कळसुबाई शिखर पायथ्यापासून 6.4 किलोमीटर अंतरावर असल्याने हर्षिताने तयारीवर कसून मेहनत घेतली. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाईची उंची समुद्र सपाटीपासून ५ हजार ४०० फूट इतकी असून, हे शिखर चढून जाण्याचा पराक्रम तिने गेल्या ८ जून रोजी केला. विशेष म्हणजे आशिया बुक ऑफ रेकॉर्डस्नेही हर्षिताच्या या पराक्रमाची नोंद घेतली आहे.