मेट्रो कारशेडसाठी ठाकरे सरकारने कांजूरमार्ग येथील जागा अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र सरकारने त्याला आडकाठी घालण्याचा प्रयत्न केला. यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सरकारची बाजू मांडली असून कांजूरची जागा महाराष्ट्राचीच असल्याचे सांगितले आहे. महसुली विभागाच्या नोंदीनुसार मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी जमिनीच्या सर्व न्याय प्रविष्ट बाबी पुर्ण केल्या असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून स्पष्ट केले आहे.
The MMRDA will therefore carry on with its work for Metro joint Car Depots at Kanjurmarg as earlier decided.
(2/2)— Aaditya Thackeray (@AUThackeray) November 3, 2020
आरेमधील जंगल वाचविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरेतील ८०० एकर जंगल राखीव केले. त्यानंतर तेथे प्रस्तावित असलेले मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथील जागेवर हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपच्या विरोधामुळे केंद्र सरकारने या जागेवर दावा केला आहे. ही जमीन मिठागराची असल्याकारणाने ती केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याचे पत्र केंद्राने राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविले आहे.
केंद्र सरकारने कांजूर येथील मेट्रो कारशेडचे कामकाज थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “राज्याचे सगळे अधिकार काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करत असल्याचे त्यांच्या कृतीतून दिसत आहे. हे दुर्दैवी आहे. महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये केंद्रसरकार हस्तक्षेप करतेय हे निंदनीय आहे.”