महाराष्ट्र आणि कर्नाटक वाद हा जुनाच आहे. हा वाद नेहमीच सर्व चर्चांच्या केंद्रस्थानी राहिला आहे. आताही महाराष्ट्र – कर्नाटक या प्रश्नावरून मोठ्या प्रमाणावर वादंग निर्माण झाला आहे. यावरच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले, राज्य निर्मितीपासूनच हा प्रश्न सुरु आहे. यासंदर्भात महाराष्ट्रातने सातत्याने आपली भूमिका ठाम ठेवली आहे. आपल्या देशात आपले संविधान आहे आणि त्याच संविधानाच्या अंतर्गत देशातील सर्व राज्यांचे अधिकार आहेत. आपली जी भूमिका आहे ती भूमिका घेऊन आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. संबंधित सर्व पुरावे न्यायालयात दाखल केले असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
याच संदर्भांत पुढे बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईल याची अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयापेक्षा कोणीही मोठे नाही अगदी कर्नाटकचे मुख्यमंत्रीसुद्धा सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठे नाहीत. त्यामुळे त्यांनी काहीही दावा ठोकला तरी देखील महाराष्ट्रातील एकही गाव बाहेर जाणार नाही आणि आमचा सीमाभाग आम्हाला परत मिळेल अशी अपेक्षा आम्हाला असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मी कोणतेच चिथावणीखोर वक्तव्य केले नाही
या सर्व प्रकरणी फडणवीस चिथावणीखोर वक्तव्य करत आहेत असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर फडणवीस म्हणाले, मी कोणत्याही प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य केले नाही. मी एवढेच सांगितले की बेळगाव, कारवार आणि निपाणीसह जी गावे आहेत त्या गावांवर आम्ही दावा सांगितला आहे आणि त्या साठी आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये लढा देतोय, ती आमची भूमिका आहे. भूमिका मांडणे याला चिथावणीखोर चुकीचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहुल आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर जी मागणी केली आहे त्याला कोणीही चिथावणीखोर म्हणू शकत नाही.
हे ही वाचा – विधानसभेची निवडणूक जवळ आली; सीमाप्रश्नाच्या राजकारणाची वेळ झाली!