कर्नाटकातील शाळा आणि कॉलेजमध्ये हिजाब घालण्यावरून सुरू असलेल्या वाद चिघळत जात आहे. विद्यार्थी ठिकठिकाणी आंदोलन करत, दगडफेक करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कर्नाटकच्या सरकारने पुढील तीन दिवस शाळा आणि कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या याप्रकरणासंबंधित उच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला नसून उद्या अडीच वाजता सुनावणी होणार आहे. याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करून या विषयाला फार महत्त्व देऊ नये असे आवाहन लोकांना केले आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, ‘कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून सुरू असलेला गदारोळ दुर्दैवी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशाप्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत. कर्नाटक हायकोर्टात याबाबत सुनावणी सुरू आहे. माझी महाराष्ट्रासह इतर सर्व राज्यांतील जनतेला विनंती आहे की, या विषयाला फार महत्त्व देऊ नये. तसेच धार्मिक कटुता निर्माण होईल, असे वक्तव्य किंवा कृती कुणीही करू नये.’
कर्नाटकात हिज़ाब प्रकरणावरून सुरू असलेला गदारोळ दुर्दैवी आहे. शैक्षणिक क्षेत्रात अशाप्रकारचे वाद निर्माणच व्हायला नकोत. कर्नाटक हायकोर्टात याबाबत सुनावणी सुरू आहे. (1/2)@abpmajhatv@TV9Marathi@zee24taasnews@News18lokmat @saamTVnews @news_lokshahi @LoksattaLive @mataonline
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) February 8, 2022
दरम्यान याप्रकरणाबाबत सोलापूर पोलिसांनी ट्विट करून सावधानतेचा इशारा दिला आहे. सोलापूर पोलीस म्हणाले की, ‘कर्नाटक राज्यातील हिजाब विवाद प्रकरणी अफवा पसरवू नका. अफवांना बळी पडून कायदा हातात घेऊ नका. अफवा ठरू शकतात जीवघेण्या.’
— SOLAPUR RURAL POLICE (@SpSolapurRural) February 8, 2022
नेमका वाद काय?
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात हिजाब घालण्यावरून वाद सुरू झाला. उडुपी येथील कॉलेजमधील काही विद्यार्थींनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र त्यांना अडवण्यात आले. कॉलेज प्रशासनाने ड्रेसमध्ये समानता असावी, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले. पण यावरून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाद वाढत गेला. याप्रकरणी विद्यार्थींनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली.
हेही वाचा – Video Viral: बुरखा घातलेल्या एकट्या मुलीला जय श्रीराम म्हणत घेरले; पाकिस्तानी भडकले