संपूर्ण व्यवस्था केलेली असतानाही संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर अनुपस्थित राहिले, असे सांगत प्राचार्य ठाले-पाटील यांनी संमेलनाचा उद्देश सफल करायचा असेल तर हिंडता-फिरता अध्यक्ष निवडला असता, अशा परखड शब्दांत आयोजकांना टोला लगावला.
आधी मला बोलू द्या
नाशिकच्या कुसुमाग्रज नगरीत सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद््घाटन सोहळ्यात ठाले-पाटील यांनी संमेलनाध्यक्ष डॉ. नारळीकर यांच्या अनुपस्थितीबाबत आपल्या भाषणातून नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सूत्रसंचालक हेमंत टकले यांनाही प्रोटोकॉलची आठवण करुन दिली. टकले यांनी उद्घाटक विश्वास पाटील यांना भाषणाची विनंती करताच ठाले-पाटील यांनी, साहित्य मंडळाचा हा प्रॉटोकॉल नसून आधी महामंडळ अध्यक्ष बोलतात असं स्पष्ट केलं. त्यानंतर टकले यांनी माफी मागत ठाले-पाटील यांना बोलण्याची विनंती केली.