राज्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दापोली येथे एक नाही तर दोन अनधिकृत बंगले बांधले आहेत, असा आरोप करत लवकरच त्यांच्यावर गुन्बहा दाखल होणार असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. अनिल परब यांनी रिसॉर्टची माहिती लपवली तसंच त्यांना वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याच्या पर्यावरण मंत्रालयाने केवळ एकच रीसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले, असा देखील आरोप सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
“मंत्रिमंडळातील ‘मुख्य’मंत्री अनिल परब यांनी दापोली समुद्र किनाऱ्यावर एक नाही दोन अनधिकृत रिसॉर्ट बांधले आहेत. ज्या रिसॉर्टची चौकशी करण्यात आली, ज्यावर कारवाई करण्यात आली ते साई रिसॉर्ट आहे. जे रिसॉर्ट लपवण्याचा अट्टहास अनिल परब यांनी केला त्याचं नाव सी काँच रिसॉर्ट असं आहे. केंद्राचे जे पथक आलं होतं, त्यांनी महाराष्ट्र सरकारला सांगितलं होतं की दोन्ही रिसॉर्ट अनधिकृत आहेत. सीआरझेडचा भंग केला आहे. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशाप्रमाणे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पर्यावरण मंत्रालयाने अनिल परब यांचं केवळ साई रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले. मात्र, सी काँच रिसॉर्ट जे त्याच्या बाजूला लागून आहे, ते वाचवण्याचं पाप आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केलं आहे,” असं किरीट सोमय्या म्हणाले.
महाराष्ट्र कोस्टल झोन व्यवस्थापन प्राधिकरणाने २५ जून २०२१ च्या बैठकीत त्यांनी घोषित केलं की अनिल परब यांचा साई रिसॉर्ट हे अनधिकृत आहे. त्यावर कारवाई करा असा निर्णय झाला. रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले की रिसॉर्टवर तोडक कारवाई करा आणि मालकांवर कारवाई करा. मात्र, अनिल परब अजून मंत्री आहेत, असं किरीट सोमय्या म्हणाले.