राज्यात सुरू असलेला भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष सोमवारी दिल्लीत पोहचला. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी रात्री शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळासह दिल्लीत केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी विशेष तपास पथक पाठवून हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी गृहसचिवांकडे केली.
किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत गेलेल्या या शिष्टमंडळात सोमय्या यांच्यासह आमदार सुनील राणे , आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, पराग शाह, भाजप महापालिका नेते विनोद मिश्रा यांचा समावेश होता.
या भेटीनंतर केंद्र सरकारचे गृहसचिव अजय भल्ला यांच्याशी आमची बरीच विस्तृत चर्चा झाली. २०-२५ मिनिटांच्या चर्चेत त्यांच्या चेहर्यावरदेखील चिंता दिसत होती. ज्याप्रकारे महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, ज्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सामान्य नागरिक, निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्यावर ज्या प्रकारे हल्ले, अत्याचार सुरू आहेत, धमक्या दिल्या जात आहेत, जिवंत गाडण्याची भाषा मुख्यमंत्र्यांचे प्रवक्ते करत आहेत, या संदर्भात आणखी तक्रारी इथे आलेल्या आहेत. आम्ही अशी 7 उदाहरणे गृहमंत्रालयाला दिली आहेत, असे किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
महाराष्ट्रात ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे म्हणजे माफिया सेनेचे सरदार दहशत माजवण्याचा प्रयत्न करीत आहेत, पोलिसांच्या मदतीने गुंडगिरी चालली आहे त्याची माहिती आम्ही दिली. शिवसेनेचे गुंड लोकांच्या घरात घुसतात. नेव्ही अधिकार्याला मारहाण करतात. आमदार-खासदारांना जेलमध्ये टाकतात. खार पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांच्या मदतीने झेड सिक्युरिटी असणार्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतात. तुझा मनसुख हिरेन करू, अशा धमक्या दिल्या जात आहेत. याचा रिपोर्ट आम्ही गृहसचिवांना दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले.