शिवसेनेच्या खासदार भावना गवळी तिसऱ्यांदा ईडी चौकशीला गैरहजर राहिल्या आहेत. किती दिवस पळणार? अखेर १०० कोटींचा हिशोब तर द्यावाच लागणार आहे, असं भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. भावना गवळी यांच्या ट्रस्टमध्ये १७ कोटींच्या कथीत गैरव्यवहाराप्रकरणी सध्या ईडीकडून चौकशी सुरु आहे.
या प्रकरणी ईडीने तीन वेळा समन्स बजावला आहे. पहिल्या समन्सला हजर न राहिल्याने त्यांना दुसऱ्यांदा समन्स बजावला. त्यावेळी चिकनगुनियाची लागण झाल्याचं सांगत १५ दिवसांचा अवधी ईडीकडे मागून घेतला होता. दरम्यान, ईडीने भावना गवळी यांना तिसऱ्यांदा समन्स बजावलं. मात्र, भावना गवळी चौकशीला गेल्या नसल्याचं कळतंय. यावर किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली.
शिवसेना नेत्या भावना गवळी तिसऱ्यांदा ED समक्ष गैरहजर
किती दिवस पळणार
अखेर ₹100 कोटींचा हिशोब तर द्यावाच लागणार@BJP4Maharashtra pic.twitter.com/NLkRQAbR9a
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 24, 2021
“शिवसेना नेत्या भावना गवळी तिसऱ्यांदा ईडी समोर हजर झालेल्या नाही आहेत. कशाला घाबरताय? १०० कोटींचा घोटाळा…२५ कोटी रुपये रोख रक्कम स्वत:च्या संस्थेतून गायब, कधीतरी भावना गवळी यांना हिशोब द्यावा लागेल,” असं सोमय्या म्हणाले.
भावना गवळींवर नेमके आरोप काय?
भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये १७ कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी तपास करत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशनकडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डाने ४३.३५ कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती असा दावा आपल्या तक्रारीमध्ये केला आहे.
याशिवाय, भावना अॅग्रो प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस कंपनीमध्ये अनियमितता केल्याचा देखील आरोप करण्यात आला होता. या कंपनीसाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून ७.५ कोटींचं कर्ज घेण्यात आलं होतं. नंतर ही कंपनी भावना गवळी यांच्या खासगी सचिवाला ७.९ कोटी रुपयांना विकल्याचा आरोप करण्यात आला होता.