कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहीहंडी उत्सवावर निर्बंध घातले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दहीहंडी उत्सवावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात सर्व गोष्टी सुरु असतात मग सणांवरच का कोरोना येतो? जर मंदिरे उघडली नाही तर मनसे घंटानाद आंदोलन करेल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. यावर मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. घंटानाद करा अन्यथा कसलाही नाद करा आमचा नाद करु नका असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. लॉकडाऊन आवडे सरकारला, राज्य सरकार कोरोनाच्या लाटा सांगत जनतेला घाबरवत असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी दहीहंडीबाबत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय की, राजकीय पोळ्या भाजून घेणारे आम्ही लोकांच्या भावनांचा विचार करतो असे दाखवतात. परंतु भावनेचा नाही तर लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा कोरोना प्रादुर्भाव वाढतो तेव्हा मात्र सगळे बीळात जाऊन लपतात अशी खोचक प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा
राज्य सरकारला राजकीय मेळावे, जन आशीर्वाद यात्रा, राडे झालेले चालतं, सण आले की कोरोना पसरतो. जे हवं ते वापरायचं आणि बाकीचं बंद करुन ठेवून द्यायचे असे राज्य सरकारचे सुरु आहे. यामुळे मनसैनिकांना सण साजरा करण्यास सांगितले होते. लॉकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे. सर्व गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. मग राज्यातील मंदिरे का नाही उघडली असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. तर जर मंदिरे उघडली नाही तर मनसे घंटनाद आंदोलन करेल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
हेही वाचा : मी सर्वांना ऑक्सिजन देतो, माझ्यासाठी राऊत हेच ऑक्सिजन – सरनाईक