मुंबईः कोकणात थंडी उशिरा सुरु झाली आहे. त्यामुळे यंदा हापूस व काजूचा मौसम उशिरा सुरु होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकरीही चिंतेत आले आहेत. रत्नागिरीत तर आंब्यावर तुडतुड्या अळींचा प्रादुर्भाव झाला आहे.
वातावरण बदलाचा फटका नेहमीच शेतकऱ्यांना बसत असतो. अधिक पाऊस, ऊन व थंडी पिकांसाठी घातक ठरते. तसेच कमी पाऊस, ऊन व थंडीही पिकांचे नुकसान करणारी ठरते. त्यामुळे बळीराजा नेहमीच आकाशाकडे डोळे लावून असतो. पिकांसाठी पोषक वातावरण असावे अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा असते.
यंदा महाराष्ट्रात थंडी तशी उशिराच सुरु झाली. डिसेंबर २०२२ च्या मध्यापर्यंत थंडीची चाहुल लागली नव्हती. मात्र शेवटच्या आठवड्यात थंडीचा जोर वाढला. देशासह राज्यातील काही शहरांचा पारा चांगलाचा घसरला. पारा -४ अंश झाल्याने श्रीनगरमध्ये तर पाण्याचे स्त्रोतही गोठले होते. त्यामुळे श्रीनगरमध्ये पाण्याची टंचाई झाली होती.
देशभरात हुडहुडी भरवणारी थंडी असली तरी कोकणात मात्र उकाडा होता. कोकणात थंडी उशिराने पोहोचल्याने येथील आंबा व काजू उत्पादनावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. आंबा व काजुचा मौसम लांबणीवर जाण्याची चिन्हे आहेत. मोहोरवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मोहोर नव्याने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतेत आले आहेत. आलेला मोहोर वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. मोहोर नव्याने आल्यास फळ येण्यासही उशिर होईल. परिणामी दर्जेदार फळाला हवा तसा भाव मिळणार नाही. बागायतदारांचे आर्थिक नुकसान होईल.
रत्नागिरी जिल्ह्यात तर हापूर आंब्यावर तुडतुडा व थ्रीप्स अळीचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. या अळींमुळे आंबा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यानेही आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आले आहेत. अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना फवारणी करावी लागणारी आहे. या फवारणीचा खर्चही मोठा आहे. शेतकऱ्यांवरचा आर्थिक बोजा वाढणार आहे.
कोकणासह थंडीचा फटका राज्यातील अन्य जिल्ह्यांनाही बसला आहे. काही जिल्ह्यात पावासाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच काही जिल्ह्यात पारा घसरल्याने थंडीचा जोर वाढला आहे.