बुधवारी (ता. 07 जून) सकाळी कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी काही हिंदुत्ववादी संघटनेकडून आंदोलन करण्यात आले. पण अचानकपणे सकाळी 10.30-11 वाजेच्या सुमारास या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर पोलिसांकडून या ठिकाणी जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज आणि अश्रुधूराचा वापर करण्यात आला. यानंतर रस्त्यावर चपलांचा खच पडलेला पाहायला मिळाला. या घटनेबाबतची संपूर्ण माहिती देण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कोल्हापुरातील राड्याप्रकरणी आत्तापर्यंत 36 जणांना अटक केली आहे. तर यांतील तीन आरोपी हे अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले आहे. या तिन्ही आरोपींना बाल न्यायालयात दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा – महाराष्ट्राला अशांत कोण करतेय?
कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात घडलेल्या घटनेप्रकरणी तीन पोलीस स्टेशन तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या प्रकरणी 36 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात येणार आहे.
तर कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाच मुलांनी औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे स्टेट्स ठेवले होते. ज्यामुळे या सर्व प्रकरणाला सुरूवात झाली. सदर मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांचे मोबाइलही जप्त करण्यात आले आहेत. तर या मुलांनी त्यांचे सर्व सोशल मीडिया अकाउंट डिलीट केल्याने ते पुन्हा मिळविण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे.
तसेच, ज्या कोणत्याही संघटनांनी जमाव जमावण्याचे आवाहन केले होते किंवा कोणीही प्रक्षोभक वक्तव्य केले होते, अशा सर्व फुटेज पोलिसांकडून तपासण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणांमध्ये या व्हिडीओच्या माध्यमातून कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार, असे देखील यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
कालच्या घटनेनंतर कोल्हापुरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. आज रात्री 12 वाजेपर्यंत कोल्हापुरातील इंटरनेट सेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच, या राड्यानंतर पोलिसांकडून घटनास्थळाचे पंचनामे करण्यात आले असून याबाबतची माहिती लवकरच देण्यात येणार असल्याचेही पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले आहे.