राज्याच्या अनेक भागांत पावसाची तुफान बॅटींग सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी केली आहे. याशिवाय, मुंबईतही रात्रभर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागांत पावसाचे पाणी साचले होते. पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीला अढथळे निर्माण झाले होते. (Konkan and western Maharashtra yellow alert by imd due to heavy rainfall)
कोकणात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक भागांत दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. शिवाय, गुरूवारी पावसाचा जोर वाढल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 41 फुटांच्या पुढे गेली आहे. परिणमी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 74 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 7 राज्य मार्गांवर पाणी आले आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख 24 मार्ग पाणी आल्याने बंद आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 31 मार्गांवर थेट संपर्क तुटला आहे. त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु आहे. कोल्हापूरनंतर पुण्यालाही हवामान विभागाने येलो अलर्टचा इशारा दिला आहे. पुण्यात दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले, धबधबे वाहू लागले आहेत.
विदर्भातही पावसाचा जोर वाढला असून, भंडारा, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. भंडाऱ्यात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
दरम्यान, धरण क्षेत्रात पाऊस दमदार हजेरी लावत असल्याने पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याच्या विसर्ग वाढण्यात आला आहे. परिणामी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा – पुढच्या वर्षापासून मेट्रो-३ मुंबईकरांच्या सेवेत, अश्विनी भिडे यांची माहिती