घरमहाराष्ट्रपावसाळ्यासाठी कोकण रेल्वेचे चतुःसूत्री अभियान, लोको पायलटला विशेष सूचना

पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेचे चतुःसूत्री अभियान, लोको पायलटला विशेष सूचना

Subscribe

पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. पावसामुळे कोकण रेल्वेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये, यासाठी कोकण रेल्वेकडून कामांचे नियोजन करण्यात आले आहे.

पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. पावसामुळे कोकण रेल्वेवर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये, यासाठी कोकण रेल्वेकडून कामांचे नियोजन करण्यात आले आहे. मुसळधार पावसात लोको पायलटने सुरक्षित वेगाने गाडी चालवावी, अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. गेल्या दहा वर्षांत मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेच्या वाहतुकीवर फारसा परिणाम झालेला नाही, यंदाही रेल्वे वाहतुकीवरील परिणाम टाळण्यासाठी कोकण रेल्वेकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे.

हेही वाचा – ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही क्लस्टर योजना राबविणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

- Advertisement -

कोकण रेल्वेने पावसाळ्यात अनुचित घटना टाळण्यासाठी 673 प्रशिक्षित रेल्वे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. घाटात अतिमुसळधार पावसामुळे दृष्यमानता खालावून होणारे अपघात होऊ नये, याकरिता 40 किमी प्रतितास या सुरक्षित वेगाने गाड्या चालवण्याच्या सूचना सर्व लोको पायलटला कोकण रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या आहेत. रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्ष आणि स्थानकांशी संपर्क ठेवण्यासाठी मोबाइल फोन देण्यात आले आहेत. मेल-एक्स्प्रेसच्या लोको पायलटला आणि गार्डला वॉकी-टॉकी देण्यात आलेले आहेत. ज्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधता येईल. आपत्कालीन स्थितीत माहिती पुरवण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर आपत्कालीन संवाद केंद्र (ईएमसी) स्थापित करण्यात आले आहेत. सर्व मुख्य सिग्नल एलईडीमध्ये रूपांतर करण्याचे काम पूर्ण झाल्याने धुक्यांमध्ये सिग्नल अधिक चांगले दिसतील, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आलेली आहे.

तर, बेलापूर, रत्नागिरी आणि मडगाव अशा तीन ठिकाणी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. हे तिन्ही नियंत्रण कक्ष हे 24 तास सुरु राहणार आहेत. यामुळे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

- Advertisement -

10 जून ते 31 ऑक्टोबर दरम्यानचे पावसाळी वेळापत्रक कोकण रेल्वेकडून लागू करण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वेगाड्यांच्या वेळांमध्ये देखील बदल करण्यात येणार आहे. तर कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवास सुरू करण्याआधी www.konkanrailway.com यावर भेट द्यावी किंवा 139 वर संपर्क साधावा, असे आवाहन कोकण रेल्वेच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे उपमहाव्यवस्थापक गिरीश करंदीकर यांच्याकडून करण्यात आले आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, विलवडे, कणकवली, मडगाव, कारवार, भटकल आणि उडुपि या नऊ स्थानकावंर स्वयंमोजणी करणारे पर्जन्यमापक कोकण रेल्वेकडून कार्यान्वित करण्यात आले आहे.

तर, पावसाळ्यात अनेक वेळा वादळी वारे येतात. या वादळी वाऱ्यांमुळे ओव्हर हेड वायर तुटण्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत. त्यामुळे या घटना टाळण्यासाठी किंवा हवेचा वेग मोजण्यासाठी रत्नागिरी ते निवासरदरम्यान पनवेलमध्ये वायूवेग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे. थिविम आणि करमाळीसाठी मांडवी पुलावर, करमाळी आणि वेरणासाठी झुआरी पुलावर, होनावर आणि मनकीसाठी शरावती पूलावर वायुवेग यंत्र बसविण्यात आले आहे. जर कोकण रेल्वे मार्गावर वाऱ्याचा वेग वाढला तर त्याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाला तातडीने मिळणार, अशी माहिती देण्यात आली आहे.

कोकणात जर का पावसाळ्यात नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली तर याबाबतची माहिती कोकण रेल्वेला मिळावी, यासाठी पूर इशारा यंत्रणा तीन ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहे. काळी नदी, सावित्री नदी आणि वाशिष्टी नदी या तीन नद्यांवर ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -