देशातील पहिलं पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हात दीड वर्षांपूर्वी सुरू झालेल्या बॅ.ना पै सिंधुदुर्ग चिपी विमानतळाकडे महाराष्ट्र शासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत असल्याचंच दिसून येत आहे. 1 सप्टेंबरपासून नियमित विमानसेवा सुरू करणार असल्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली होती. मात्र ही घोषणा म्हणजे सरकारचं गारजच असल्याचं समोर आलं आहे. मागच्या तीन दिवसांपासून चिपी विमानतळावर एकही विमान उतरलेलं नाही. तसंच, 1 सप्टेंबरला अपेक्षित असलेली विमानाटी फेरीही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता नियमित विमानसेवा मिळण्याचे कोकणवासियांचं स्वप्न हे देखील या सरकारचा जुमलाच तर नाही ना, असा प्रश्न आता जनतेला पडला आहे. (Konkan Sindhudurg Chipi still neglected There is no regular flight service at the airport )
येत्या 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रवासी विमान सेवा सुरळीत सुरू करण्याची विनंती रवींद्र चव्हाण यांनी केली होती. त्यानुसार 1 सप्टेंबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग ते मुंबई ही प्रवासी विमान सेवा चिपी विमानतळावरून नियमितपणे सकारात्मकरित्या सुरू करण्याचे आश्वासन शिंदे यांनी दिल्याचं चव्हाण यांनी सांगितलं होतं, मात्र आजसुद्धा एकही विमान चिपी विमानतळावर उतरलं नाही.
येत्या काळात विमानसेवा बंद होणार?
चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा सुरू झाली होती. परंतु कालांतराने ही विमान सेवा अनियमित झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवासांना रस्ते मार्ग, रेल्वेने कोकणात जावे लागत होते. काहीजण गोवा विमानतळावर उतरून पुन्हा कोकणात यावे लागत असे. कोकणच्या सिंधुदुर्गच्या वेंगुर्लेमधील चिपी विमानतळावरून आता अनियमित विमानसेवा सुरू आहे. विमानसेवा अनियमित असून याकडे कोणत्याही राजकीय पक्षाचं लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. येत्या काळात ही विमानसेवा बंद होईल की काय अशी भीती स्थानिकांना वाटू लागली आहे.
(हेही वाचा: “जीएसटीप्रमाणे एक देश, एक निवडणूक…”, अजित पवारांकडून स्वागत )
खासदार विनायक राऊत यांनी या विमानतळावरुन सिंधुदुर्ग ते शिर्डी आणि मैसूर विमासेवा सुरू करू, असं म्हटलं होतं. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नियमित विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक उड्डाण मंत्री जोतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन मार्ग काढू असं म्हटलं होतं. मात्र, अद्यापही विमानसेवा सुरू झालेली नाही. भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील दुसरं विमान याठिकाणी सुरू केलं तेही काही दिवसांत बंद झालं होतं.
चिपी विमानतळ उद्घाटनासाठी नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी राणेंनी जोरदार फटकेबाजी केली होती. सिंधुदुर्गामध्ये केलेल्या विकासाचा पाढाही वाचला होता. तसेच विकास कामांवरून ठाकरे सरकारला टोमणेही मारले होते.
या विमानतळाला 800 कोटी खर्च करून उभारण्यात आलं. चिपी गावात हे विमानतळ बांधण्यात आलं आहे. देशातील पहिल्या पर्यटन जिल्ह्याला गती देण्यासाठी हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. मात्र, या विमानतळाचा फायदा पर्यटनाला होताना दिसत नाही.