महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगडजवळील महत्त्वाच्या पुलावरुन पाणी गेल्यामुळे पुढील १२ गावांचा संपर्क तुटला आहे. महाबळेश्वरमधील चतुरबेट गावचा पूल हा दळणवळणासाठी महत्त्वाचा पूल आहे. हा चतुरबेट गावचा पूल मागील १६ ते १७ तासांपासून पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे शेतीच्या कामासाठी दुसऱ्या गावात गेलेले शेतकरी नागरीक हे मागील दोन दिवसांपासून अडकून राहिले आहेत. कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे प्रशासनाने नदी जवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महाबळेश्वर तालुक्यात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी, ओढे दुथडी भरुन वाहू लागले आहेत. अनेक शेतकऱ्यांची शेतीची कामे झाली होती. नदीनं रौद्ररुप धारण केल्यामुळे नदीचा प्रवाह शेतातून वाहू लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. चतुरबेट मधील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले आहेत. १२ गावांचा संपर्क तुटला असल्यामुळे वयोवृद्ध, गंभीर आजाराने ग्रस्त ज्येष्ठ नागरीक, महिला यांना तात्काळ उपचार मिळत नाही. उपचाराअभावी रुग्ण दगावण्याची शक्यता आहे.
कोयनामाईचा दुथडी भरून प्रवाह#Mahabaleshwar pic.twitter.com/eonGcEgnnq
— Swapnil Jadhav (@jSwapnil19) July 22, 2021
दुसऱ्या गावात नागरिक अडकले
महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे अचानक कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नदी, ओढे पुर्ण क्षमतेने वाहू लागल्यामुळे पुलावरुन पाणी जाऊ लागले. कामांसाठी दुसऱ्या गावात गेलेले नागरिक तिकडेच अडकले आहेत. मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यांमुळे विज पुरवठा खंडीत झाल्यामुळे गावांचा संपर्क तुटला असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे.
मागील वर्षाच्या पावसात पुलाला तडे
चतुरबेट गावचा पूल पुढील १२ गावांच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा पूल आहे. दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो यामुळे पूल कित्येक दिवस पाण्याखालीच असतो. पूल पाण्याखाली गेल्यावर वाहतूक विस्कळीत होते यामुळे नागरीकांना योग्य उपचार मिळत नसल्याने दगावण्याचे धोका वाढतो. पुलाची उंची वाढवण्यासाठी चतुरबेट ग्रामपंचायतीकडून वारंवार प्रयत्न केला जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात पुलाच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला असून पुढील वर्षी या पुलाचे काम करण्यात येण्याची शक्यता आहे.