मुंबई : कुर्लामध्ये एलबीएस मार्गावर भरधाव बेस्ट बसने 6 जणांचे बळी घेतला. या अपघातात एकूण 49 जण जखमी झाले आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. अशामध्ये या बेस्ट बसचा वाहनचालक संजय मोरे हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातावेळी त्याने मद्यप्राशन केले होते का? त्याला गाडी चालवण्याचा अनुभव नव्हता का? अशा अनेक चर्चा रंगल्या आहेत. अशामध्ये संजय मोरे याच्याबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Kurla BEST Bus Accident Sanjay more driver background)
हेही वाचा : Kurla Bus Accident : मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत तर…; कुर्ला अपघाताबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा
समोर आलेल्या माहितीनुसार, संजय मोरे हा घाटकोपर पश्चिमेला असणाऱ्या असल्फा परिसरात राहत आहे. त्याच्या कुटुंबीयांनी तो दारू पीत नसल्याचे सांगितले आहे. ‘आपलं महानगर’ला नाव न सांगण्याच्या अटीवरून एका बेस्ट अधिकाऱ्याने माहिती दिली की, बेस्ट बसने इलेक्ट्रिक बसेस कंत्राट ईव्ही ट्रान्स या हैदराबाद स्थित कंपनीकडे दिले आहे. या अंतर्गत 2100 गाड्यांपैकी 275 गाड्या या मुंबईत दाखल झाल्या आहेत. तर, संजय मोरे हादेखील एक कंत्राटी कामगार म्हणूनच या गाडीवर चालक म्हणून रुजू झाला होता. त्याच्याकडे 1991 सालचा ड्रायव्हिंग बॅच असून बेस्टच्या ताफ्यात दाखल झालेल्या ऑटो-गिअर असलेल्या या गाड्यांचे त्याला फक्त तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्याला 23 हजार पगार असल्याचेही सांगण्यात आले आहे. तसेच, ऑटो गिअर असल्याकारणाने आणि कमी प्रशिक्षण असल्याने संजय मोरेचा या बसवरचा ताबा सुटला. त्यातच तो गांगरून गेल्याने ब्रेक दाबण्याऐवजी त्याने एक्सिलेटरवरील दाब वाढविल्याने अपघाताची तीव्रता वाढल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आहे.
एका वृत्तवाहिनीला संजय मोरे याच्या कुटुंबीयांनी माहिती दिली. यामध्ये अनेक खुलासे करण्यात आले. “माझे वडील हे कधीच कुठलाही नशापान करत नाहीत. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून माझे वडील हे बेस्टचे कंत्राटी कामगार म्हणून काम करत आहेत. एवढ्या वर्षात कधीही त्यांच्याकडून अशा प्रकारचा कोणताही अपघात झालेला नाही. हा अपघात बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळेच.” असा दावा त्याने केला आहे. तसेच, संजय मोरेच्या पत्नीनेदेखील अनेक खुलासे केले. त्याच्या पत्नीने सांगितले की, “सकाळी त्यांनी नियमितपणेच सुरुवात केली होती. माझ्या नवऱ्याने कधीही मद्यप्राशन केलेले नाही. कधीही कोणाला त्रास देणाऱ्यांमधले नाहीत. त्यांच्याकडून कधीही कोणता अपघात झालेला नाही. माझा नवरा निर्दोष आहे. सरकारी गाड्यांची व्यवस्थित काळजी घेतली नाही, तर चालक काय करणार?” असे म्हणत त्यांनी बेस्ट प्रशासनावर निशाणा साधला आहे.