भाजप नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाने उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरीत शेतकऱ्यांना गाडीने चिरडल्यामुळे ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणामुळे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. संसदेतही विरोधकांनी या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी गोंधळ घातला होता. परंतु संसदेतील कामकाज स्थगित करण्यात आले आहे. आमच्या १२ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. ५० खासदारांना करा अन्यथा सगळ्या खासदारांना केलं तरी प्रश्न विचारणार असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राऊतांनी दिल्लीतील विरोधकांच्या मोर्चाला संबोधित करताना भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. संसदेचे अधिवेशन केंद्र सरकारच्या मर्जीने संपू शकते. लखीमपुर खेरीची लढाई संपणार नाही. लखीमपुरमध्ये कशाप्रकारे शेतकऱ्यांना चिरडण्यात आले हे संपूर्ण देशाने आणि जगाने पाहिले आहे. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पाहिले नाही. या प्रकरणाचा रिपोर्ट एसआयटीने जारी केला आहे. एसआयटी केंद्रानेच नेमली आहे परंतु त्यांचाच या रिपोर्टवर विश्वास नाही असे राऊतांनी म्हटलं आहे.
हवं तर सर्वांना निलंबित करा…
गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येऊन आम्हाला प्रश्न विचारतात की महाराष्ट्रात काय सुरु आहे? मात्र तुमच्या राज्यात ज्या शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली. खून करण्यात आले त्याविरोधात कोणी बोलत नाही. तसेच दोषींवर कारवाई करत नाही असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. विरोधी पक्षातील नेते तुम्हाला या प्रकरणावर वारंवार प्रश्न विचारत राहणार आहेत. आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा आता १२ जणांना केलं आहे. उद्या ५० खासदारांना करा अन्यथा सगळ्या खासदारांना करा आम्ही शांत बसणार नसून प्रश्न विचारत राहणार, गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण
उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या मुलाने शेतकऱ्यांवर गाडी घातली. या घटनेमध्ये ८ शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले होते. देशातून केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनातही लोकसभा खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. राज्यसभा आणि लोकसभेतील विरोधी पक्षाच्या खासदारांनी अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
हेही वाचा : तुमचे लवकरच वाईट दिवस सुरू होणार, जया बच्चन संतापल्या