घरताज्या घडामोडीLata Mangeshkar: अलौकिक स्वर आज हरपले; शरद पवारांनी वाहिली लतादीदींना श्रद्धांजली

Lata Mangeshkar: अलौकिक स्वर आज हरपले; शरद पवारांनी वाहिली लतादीदींना श्रद्धांजली

Subscribe

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज सकाळी ९३व्या वर्षी निधन झालं. लतादीदींच्या निधनामुळे भारतीय संगीत क्षेत्रातील एक महत्त्वाचं पर्व संपलं. संपूर्ण कलाविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर नेते मंडळी त्यांच्यासोबत आठवणी शेअर करून त्यांना आपल्या भावना व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ट्विटद्वारे म्हणाले की, जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील असे सांगतानाच शरद पवार यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळला – जयंत पाटील

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. अनेक दशकं भारतात आणि भारताबाहेर संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे. संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केली आहे.

- Advertisement -

लतादीदी जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी गायलेली गीते आपल्यात कायम राहतील. मला आठवतंय की एक वेळ होती, जेव्हा सकाळी रेडिओ ऑन करून दिदींच्या आवाजाने अनेकांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. त्यांनी गायलेले ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन देत त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला त्यावेळचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करुन श्रद्धांजली वाहिली आहे. ज्या आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले, ते स्वर आणि सूर आता दिदींच्या स्मृती सदैव तेवत ठेवेल, असे जयंत पाटील म्हणाले.

थम गया सुरों का कारवां, लतादीदींच्या निधनाने संगीतातले एक पर्व संपले – छगन भुजबळ

लतादीदींच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी असून त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असून दिदींच्या जाण्याने संगीतातले एक पर्व संपले असल्याच्या शोकभावना अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. आपल्या शोकसंदेशात मंत्री छगन भुजबळ यांनी लता मंगेशकर म्हणजे संगीतातील पूर्णविराम. त्यांच्या गायनाने फक्त भारतातीलच नाही तर जगभरातील संगीतप्रेमीं मंत्रमुग्ध होत असतं. म्हणूनच त्यांना संगीतातील गानसरस्वती म्हटले जायचे. आज लतादीदी यांचे निधन झाले असले तरी संगीताच्या माध्यमातून त्या कायमच अजरामर राहतील असेही छगन भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

“नाम गुम जाएगा चेहरा ये बदल जाएगा मेरी आवाज़ ही पहचान है ग़र साथ रहे… !” लतादीदी यांनी गायलेल्या या गाण्याप्रमाणे आज शरीराने जरी त्या नसल्या तरी त्यांचे स्वर कायम आपल्यात राहतील. लतादीदी यांच्या निधनाने मंगेशकर कुटुंबियांवर आणि संगीतप्रेमींवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी आणि माझे कुटुंबीय मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर त्यांच्या मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी प्रार्थना देखील छगन भुजबळ यांनी केली आहे.

जो पर्यंत पृथ्वी आहे तो पर्यंत .. त्या अजरामर आहेत – जितेंद्र आव्हाड

FM/Radio लावला कि लता दीदींचे स्वर कानावर पडणार ….त्या स्वर रूपानी आपल्यातच राहतील …आपण नसू पण त्यांचे स्वर असतील जो पर्यंत पृथ्वी आहे तो पर्यंत .. त्या अजरामर आहेत, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी शोक व्यक्त केला.

भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना उपमुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

“‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी… ? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादिदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीतविश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे. लतादिदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादिदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही… अशा लतादिदी आता पुन्हा होणे नाही…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गानकोकीळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लता मंगशेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.


हेही वाचा – Lata Mangeshkar Passes Away: ‘तेरे बिना भी क्या जिना…’ म्हणत राऊतांचं ट्विट; रश्मी ठाकरे रुग्णालयात पोहोचल्या


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -