मुंबई : समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘नमो 11 कलमी कार्यक्रम’ प्रत्येक पालकमंत्र्यांनी प्राधान्याने राबवावा. शासनाच्या विविध योजनांचे लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून राज्याच्या विकासाला गती द्यावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केले.
हेही वाचा – सरवणकरांच्या नियुक्तीमुळे पोट दुखत असेल तर…; केसरकरांचा आदित्य ठाकरेंना टोला
मंत्रालयातील मंत्रिमंडळ बैठक सभागृह येथे, मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘नमो 11 कलमी कार्यक्रमा’चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित होते. आमदार मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, अमित साटम, प्रकाश सुर्वे, आशिष शेलार, मिहिर कोटेचा, पराग शहा, अतुल भातखळकर, पराग अळवणी यांच्यासह मुंबई उपनगरमधील लाभार्थी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमस्थळी उपस्थित होते.
प्रधानमंत्री @narendramodi यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर केलेल्या ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रमाचा आज मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis ,पालकमंत्री मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा आणि मंत्रीमंडळातील सर्व सदस्य… pic.twitter.com/LiU3fBTkdw
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 8, 2023
शासनाच्या सर्व योजना सर्व घटकांपर्यंत पोहोचतील यासाठी आपले शासन प्रयत्नशील असून. राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील पाठिंबा मिळत आहे. हेच लक्षात घेऊन राज्यात नरेंद्र मोदी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो 11 कलमी कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून दीड कोटी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहोत. याद्वारे विकास होण्यास मदत मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – मुंबई आणि परिसरात 477पैकी केवळ 12 ‘आरोग्यवर्धिनी केंद्र’ झाली सुरू, ठाकरे गट आक्रमक
हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून आपत्तीच्या काळात नियम बाजूला ठेवून दिलेली मदत ही आतापर्यंतची सर्वाधिक मदत ठरली आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने अनेक उपक्रम सुरू केले. पीक विमा योजना, प्रधानमंत्री नमो सन्मान योजना यासारख्या योजना राबविल्या. आरोग्य, शिक्षण, उद्योग, शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग, मागासवर्ग घटक असा सर्वसमावेशक विकास करण्यासाठी आपले शासन कटिबध्द असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
समाजातील सर्व घटकांना लाभ होईल – उपमुख्यमंत्री फडणवीस
‘नमो 11 कलमी’ कार्यक्रमातून सर्व समाज घटकांसाठीच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात. पंतप्रधान मोदी यांनी घेतलेल्या अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या स्थानावर गेली आहे त्याच धर्तीवर राज्यातही सर्व घटकांचा विकास करून राज्याला विकासाच्या पथावर नेण्याचा मानस या उपक्रमातून आपण साध्य करत आहोत. कामगार, महिला तसेच समाजातील इतर घटकांना विकासाच्या समान संधी उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम निश्चित मदत करेल. प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘नमो 11 कलमी कार्यक्रम’ निश्चित मोलाची भूमिका बजावेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.