मागील महिन्यात राज्याच्या काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. जोरदार वारा आणि मुसळधार पावसामुळे विदर्भ, मराठवाडा यांसह राज्याच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचा फटका बसला. याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच, लवकरात लवकर पूरग्रस्तांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. (leader of opposition ajit pawar meet maharashtra governor bhagat singh koshyari)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी “राज्याच्या अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ११५ हुन अधिक लोकांचा बळी गेला आहे. मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरांची हानी झाली आहे. तसेच, पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या पूरग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी आज राज्यपालांची भेट घेतली” असे अजित पवार यांनी म्हटले.
“राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर अद्याप एक महिना उलटला असला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. पावसाळी अधिवेशन अद्याप सुरू होत नाही. जुलैमध्ये हे अधिवेशन होत असते. परंतु, ऑगस्ट महिना उजाडला तरी अधिवेशन झालेला नाही. दोघांवर सरकार चालवले जात आहे. आम्ही मुख्यमंत्र्याची वेळ मागितली असून, उद्या, बुधवारी त्यांची भेट घेणार आहे”, असेही अजित पवार यानी म्हटले.
विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेत अतिवृष्टी झालेल्या भागातील नागरिकांना मदत करावी अशी मागणी केली. तसेच, राज्यपालांना निवेदन दिले. यावर राज्यपालांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तसेच, यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलू, असे अश्वासनही राज्यपालांनी दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा – संजय राऊतांच्या घरातील रोकडवर मुख्यमंत्र्यांचं नाव, शिंदे म्हणाले मी त्यांच्या घरी…