एकनाथ शिंदेसोबतच्या बंडखोर आमदारांना आसामचे वातावरण एन्जॉय करण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे 11 जुलैपर्यंत त्यांना आसामध्ये आराम करायचा आहे. महाराष्ट्रात या बंडखोरांचे काही काम नाही, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही लोकांनी तयार केलेल्या डबक्यात पडू नये, असा सल्ला दिला आहे. लवकरच ठाण्यामध्ये तुम्हाला वेगळे चित्र दिसेल असेही सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
पण त्यांनी या डबक्यात उतरू नये –
संजय राऊत यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत म्हणाले, सध्या राजकीय वातावरणात बदल सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडे 116 आमदारांचे बळ आहे. हा विरोधी पक्ष विधायक काम चांगल्या पद्धतीने करून महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. फडणवीस यांच्याकडे ती क्षमता आहे. पण त्यांनी या डबक्यात उतरू नये. काही लोकांनी आता एक डबक तयार केले आहे. त्यामुळे त्यांनी या डबक्यात उतरू नये अन्यथा पंतप्रधान मोदी, ते स्वत: आणि पक्षाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्यपालांनी १२ आमदारांबद्दल निर्णय घ्यावा –
राज्यपालांनी १२ आमदार राजभवनाच्या टेबलावर पडून आहेत, त्या बद्दल निर्णय घ्यावा, असा टोला राऊतांनी राज्यपाल कोश्यारींना लगावला. राऊत म्हणाले. बंडखोरांपैकी अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. कोर्टाच्या निर्णयानंतर बडखोर चलबिचल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी काय करायचे हा त्यांचा निर्णय असून तो घेण्यासाठी ते सक्षम आणि समर्थ आहेत. गुवाहाटीमध्ये बसुन सल्ले देण्याची गरज नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी एकनाथ शिंदेसह बंडखोर आमदारांना लगावला आहे.