मुंबई – राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. मुंबईसह ठाणे परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दरम्यान आजही हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर अहमदनगर आणि जळगाव जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तीन ते चार दिवसात राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणीसाठ्यात देखील मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाले. तसेच अनेक ठिकाणी शेत जमिनी खरवडून गेल्या आहे. आत्तापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. काही ठिकाणी या पावसामुळे पिके पिवळी पडू लागली आहेत, तर काही ठिकाणी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे.
यलो अलर्ट म्हणजे काय –
यलो अलर्टमध्ये हवामान खात्याने हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असा या अलर्टचा अर्थ आहे.
धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीचा कापसाला फटका –
राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. धुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. अति पावसामुळे कपाशीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला. तसेच रस शोषण करणाऱ्या अळीचा देखील प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे कापसाचे उत्पन्न कमी होणार आहे.