कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सुरुवातील २१ आणि नंतर १९ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊन सर्वाधिक फटका रोजंदारीवर गुजराण करणाऱ्या लोकांना बसला आहे. विशेषतः ज्यांची उपजीविका प्राण्यांवर अवलंबून आहे, अशा लोकांची व्यथा तर शब्दात सांगता येणार नाही. पालघर जिल्ह्यात टांगा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुबांनाही लॉकडाऊनचा फटका बसला असून पालघारच्या शिरगाव आणि सातपाटी भागात टांगा व्यवसायिकांचे पाच घोडे उपासमारीमुळे दगावले आहेत.
शिरगाव आणि सातपाटी भागात टांगेवाले टांगा चालवून उपजीविका भागवत असतात. त्यांच्या घोड्यांसाठी विक्रमगड येथून चारा येत असतो. मात्र लॉकडाऊनच्या काळात चाऱ्याचा पुरवठा झाला नाही. चारा मिळाला नाही, म्हणून या घोड्यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप टांगा मालकांनी केला आहे. तर सातपाटी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी घोडे दगावल्याचा वृत्ताला दुजोरा दिला. मात्र घोड्यांचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला, याचा अद्याप तपास सुरु असल्याचे सांगितले.
पालघर जिल्ह्यातील शिरगाव, सातपाटी, वडराई, माहीम, केळवे माहीम, अर्नाळा, वसई विरार, डहाणू या कोकण पश्चिम किनारपट्टीच्या भागात अंदाजे १२० ते १२५ घोडे आहेत. लॉकडाऊनच्या काळात टांगा आणि घोडा पाळणाऱ्यांवर संक्रात आली. करोना विषाणू रोखण्यासाठी गर्दी टाळा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा हा मूलमंत्र आहे. महसूल यंत्रणेपेक्षा जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा अधिक सक्रिय झाली असून, आणीबाणीपेक्षाही भयानक त्रास सामान्य जनतेला दिला जात आहे, अशा तक्रारी आहेत. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या टांगामालकांवर पोलिसांनी कठोर प्रतिबंध घातले. लॉकडाऊनमुळे शिरगावच्या घोड्यांना आहार मिळू शकला नाही. त्यामुळे भूक आणि उपासमारीने शिरगावातील पाच घोड्यांचा मृत्यू झाला, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.