राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या जरी कमी झाली असली तरी अजून कोरोना परिस्थिती आटोक्यात आली नाही. कोरोना रोखण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत राज्यातील लॉकडाऊन १५ जुनपर्यंत वाढवण्यात आला आहे. परंतु ज्या जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे अशा भागात अनलॉक प्रक्रिया करण्यात येणार आहे. राज्यातील १८ जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये टप्प्याने शिथिलता देणार असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषित केले होते. परंतु हा निर्णय शासनदरबारी असल्यामुळे यावर विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अपरिपक्वता की श्रेयवाद? असा सवाल करत प्रश्नांची सरबत्ती केली आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी १८ जिल्ह्यांतील लॉकडाऊनच्या अटी शिथिल करण्यासाठी ५ टप्पे ठरविण्यात आले असल्याची माहिती दिली. तसेच राज्यातील १८ जिल्ह्यांमध्ये शुक्रवार पासून अनलॉक करण्यात येत असल्याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. यानंतर लगेच राज्य सरकारने हा निर्णय विचारधीन असल्याचे स्पष्ट करत उद्यापासून राज्यातील लॉकडाऊन उठवला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या सावळ्या गोंधळामुळे राज्यातील जनतेमध्ये मात्र संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.
राज्य सरकारमध्ये असलेल्या संभ्रमावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटले आहे की, काय सुरू, काय बंद ?, कुठे आणि केव्हापर्यंत ?, लॉक की अनलॉक? पत्रपरिषद की प्रेसरिलीज? अपरिपक्वता की श्रेयवाद? असे सवाल फडणवीसांनी उपस्थित केले आहेत. सरकारमध्ये श्रेयवादावरुन सगळं काही अलबेलं असल्याचे दिसते आहे.
काय सुरू, काय बंद ❓
कुठे आणि केव्हापर्यंत❓
लॉक की अनलॉक❓
पत्रपरिषद की प्रेसरिलीज❓
अपरिपक्वता की श्रेयवाद❓#Lock #Unlock pic.twitter.com/bZF1AEx9yY— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 3, 2021
अंधेर नगरी चौपट राजा सारखे राज्य सरकार
भाजप नेते आणि भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकारमध्ये असलेल्या समन्वयाच्या अभावावर पुन्हा विरोधकांनी बोट ठेवले आहे. केशव उपाध्ये यांनी ट्विट करत अंधेर नगरी चौपट राजा अशी अवस्था राज्याची महाआघाडी सरकार करत आहे. कुणाचा कुणाशी ताळमेळ नाही राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रेस घेऊन अनलॅाकडाऊन केल्याची घोषणा करतात. मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत बैठकीत निर्णय झाल्याचे सांगतात, काहीवेळानतंर सरकारी प्रेसनोट येते अनलॅाकडाऊनचा प्रस्ताव आहे निर्णय नाही असे म्हटले आहे.
सरकार आहे की सर्कस?
अनलॉक प्रक्रियेवर अवघ्या काही मिनीटमध्ये निर्णयावरुन यु-टर्न घेणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी खोचक टीका केली आहे. मंत्री घोषणा करतात निर्बंध हटवणार, एका तासाने शासन निर्णय जाहीर होतो तसं काही नाही हो असे ट्विट करत हे सरकार आहे की सर्कस? असा खोचक सवाल आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. ठाकरे सरकार आहे U-Turn सरकार… अनलॉक वरून पुन्हा U-Turn असे देखील भातखळकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : तत्वतः म्हणायचं राहिलं, Unlock चा निर्णय CM घेणार – विजय वडेट्टीवार