कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. महानगरांमधील वाढती रुग्णसंख्या, दाटीवाटीने असलेली घरे, तसेच राज्यातील शाळांना जाहीर करण्यात आलेल्या सुट्टया यामुळे मुंबईकर चाकरमान्यांचे पाय गावाकडे वळले आहेत. गेल्या दोन दिवसांत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्यांची संख्या अधिक वाढली असून १ मे रोजी (आज) सकाळी ११ पर्यंत सुमारे ६ हजार ६४२ इतक्या बाहेरील व्यक्ती खारेपाटण चेकपोस्ट येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. आज पहाटेपासून मुंबईवरून खासगी बसेसने नागरिक गावी येण्याचे प्रमाण वाढले असून खारेपाटण चेक पोस्ट येथे नाव नोंदणी करण्यासाठी चाकरमान्यांची मोठी रांग होती. तसेच आज ५४३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खारेपाटण चेकपोस्ट येथे आरोग्य व महसूल पथक कायमस्वरूपी ठेवण्यात आले. मुंबईवरून तसेच बाहेरील जिल्ह्यांतून येणाऱ्या नागरिकांची व त्यांच्या वाहनांची रजिस्टरमध्ये नोंदणी केली जाते. एखाद्या प्रवाशाला कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास त्यांची तात्काळ रॅपिड टेस्ट खारेपाटण चेकपोस्टला केली जात आहे. आजपर्यंत खारेपाटण चेकपोस्ट येथे बाहेरून येणाऱ्या २२५ नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात आली असून यापैकी केवळ तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरीत २२२ नागरिकांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.
खारेपाटण चेक पोस्ट येतेच आरोग्य पथकाच्या वतीने मुंबईवरून येणाऱ्या चाकरमानी वर्गाच्या हातावर होम क्वांरंटाईनचे शिक्के मारले जात आहेत. तर गेल्या दोन दिवसात गावी येणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने वाढली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबईकर चाकरमान्यांची हळूहळू गर्दी वाढू लागली आहे.