हे सरकार आज कोसळेल का उद्या कोसळेल हे मी कधीही सांगितले नाही; पण आपल्या वजनाने हे सरकार कोसळणार आहे. ज्या दिवशी कोसळेल त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले आहे. ते रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत पत्रकारांशी बोलत होते.
नियम बदलण्याची बैठक ही नियमित अध्यक्षांच्या अध्यक्षतेत होऊ शकते. उपाध्यक्षांना तो अधिकार नाही. पण या सरकारकडे बहुमत आहे तर मग ही उठाठेव कशासाठी? सरकार घाबरते कशासाठी? यासंदर्भात जेव्हा विषय येईल तेव्हा आमची भूमिका सांगू; पण सरकारमध्ये सर्व काही आलबेल नाही, आमदारांवर विश्वास नाही. त्यामुळे हात वर करून निवडणूक घेण्याचा विषय आलेला आहे, असा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला. आम्ही सक्षम विरोधीपक्ष आहोत. पहिल्या दिवसापासून हीच आमची भूमिका आहे. आम्ही लोकांचे प्रश्न मांडणार आहोत, असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
पंकजा मुंडेंवर बोलणे टाळले
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या संदर्भात आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सगळे खुलासे केले आहेत. त्यावर अधिक काही बोलणार नाही, असे म्हणत त्यांनी पंकजा मुंडे यांच्या मुद्यावर भाष्य करणे टाळले.
भाजप अभियान
17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापर्यंत आम्हाला बूथ अभियान राबवायचे आहे. त्यासाठी प्रशिक्षण वर्ग आज आयोजित करण्यात आला आहे. यात बूथ रचना संदर्भात चर्चा होणार आहे.