शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषद सदस्य रामदास कदम यांनी विधानपरिषदेत तिसऱ्या दिवशी उपस्थिती लावली होती. विधानपरिषदेत बोलताना रामदास कदमांनी मनसेचे नेते वैभव खेडेकर यांच्यावर घणाघाती आरोप केले आहेत. खेडेकर यांनी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करुन घेतला आणि स्वतःची इमारत बांधली आहे. त्या इमारतीकडे जाण्यासाठी त्यांनी त्या निधीचा वापर केला आहे. समाजकल्याणाचा पैसा स्वतःसाठी वापरला असल्यामुळे दोषी देखील ठरवलं आहे. रामदास कदम यांनी वैभव खेडेकरांवर आरोप केले असून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेना कारवाईची विनंती केली आहे.
विधानपरिषदेचे सदस्य रामदास कदम यांनी विधानपरिषदेत बोलताना वैभव खेडेकरांवर निशाणा साधला आहे. रामदास कदम म्हणाले की, एकावेळी आपण निधी खर्च करण्यासाठी सभागृहाकडे मागणी करतो आणि दुसऱ्या बाजूला या निधीची गैरवापर केला जात आहे. तालुका खेड जिल्हा रत्नागिरीमध्ये एक मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी बौद्धवाडीसाठी पूल बांधण्यासाठी २० लाख रुपये मंजूर करुन घेतले. त्यावेळी तिथे पालकमंत्री उदय सामंत होते. तिथे बौद्धवाडी नाही तर स्वतःची इमारत बांधली आहे. त्यामध्ये ४ फ्लॅट त्याच्या बायकोच्या नावे आहेत. या इमारतीमध्ये जाण्यासाठी २० लाखांचा पूल बांधला आहे.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागाला अनेक पत्र लिहिले आहेत. या विभागाकडून पत्र दाबून ठेवली गेली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर त्यांनी चौकशी केली. चौकशीमध्ये खेडेकर दोषी आढळले आहेत. त्यांच्याकडील सगळं ताब्यात घेतलं आहे. समाजकल्याणाचा पैसा वापरला असल्यामुळे त्यांना दोषी ठरवलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालावरुन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना १० वेळा पत्र लिहिले आहेत की तातडीने कारवाई करावी. परंतु या पत्राला कोणतेही उत्तर आले नाही असेही रामादस कदम यांनी म्हटलं आहे.
नगरविकास विभागाकडे १ महिना तक्रार करुन झाला तरी त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. खेडेकरांना २ पोलिसांचे संरक्षण देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हे संरक्षण देण्यात आले असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले आहे. तसेच विधानपरिषद उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे न्याय देण्याची विनंती रामदास कदम यांनी केली आहे.
खेडेकरांनी २५ लाख रुपयांचे डिझेल वापरले
वैभव खेडेकर हे नगराध्यक्ष आहेत ते एकही लिटर डिझेल वापरु शकत नाही. परंतु ते खाजगी आणि सरकारी वाहनांमध्ये डिझेल वापरत आहेत. आतापर्यंत २५ लाख रुपयांचे डिझेल त्यांनी वापरले आहेत. यामुळे संबंधित व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे. नगरविकास खात्याने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे.
हेही वाचा : रामदास कदमांना विधान भवनाच्या गेटवर अडवलं, RTPCR टेस्ट न केल्याने पोलिसांचा मज्जाव