लखीमपूर खेरी येथे मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीने चिरडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी सोमवारी महाविकास आघाडीने राज्यात बंद पुकारला. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर खोचक टीका केली. या टीकेला आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. संवेदनाहीन आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी, अशा शब्दात चाकणकर यांनी अमृता फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्विट करत आज वसुली चालू आहे की बंद? असा खोचक सवाल करत महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. यावर रुपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. “वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी,” असं ट्विट करत रुपाली चाकणकर यांनी अमृता पडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो??
संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी. https://t.co/SdHZLYxPmp
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) October 11, 2021
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडीला खोचक टोला लगवला आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी कोणी मला सांगेल का की, आज वसुली चालू आहे की बंद? असं म्हटलं आहे. भाजप सातत्यानं वसुली सरकार म्हणून महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहे. त्यामुळे अमृता फडणवीस यांनी याच पार्श्वभूमिवर महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावला आहे.