उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरीमध्ये शेतकरी शांततापुर्वक उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून आंदोलन करत होते परंतु केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातल्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होऊन मोठा नरसंहार झाला याविरोधात केंद्र सरकारने अद्याप कारवाई केली नाही. शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी आणि घटनेचा निषेध म्हणून सोमवारी बंद पुकारला आहे. या बंदला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा पाठींबा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस पक्षातील प्रतिनिधींनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माहिती दिली की, महाविकास आघाडीमधील तिन्ही राजकीय पक्षाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सोमवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदबाबत माहिती द्यावी असे संजय राऊत यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक, शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत उपस्थित होते.
शिवसेनेचा महाराष्ट्र बंदला पुर्ण प्रतिसाद
खासदार संजय राऊत यांनी शिवसेना महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला शिवसेना पुर्ण ताकदीने उतरणार असल्याचे सांगितले आहे. ११ तारखेला जो महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या समर्थनात आणि लखीमपुर प्रकरणात शेतकऱ्यांच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याबाबत निषेध करण्यासाठी बंद पुकारला आहे. त्याला महाविकास आघाडीने सक्रिय पाठिंबा दिला आहे. खासकरुन शिवसेना बंदमध्ये पुर्ण ताकदीने उतरणार असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. या देशातल्या संविधानाची हत्या कायद्याची पायमलल्ली आणि अन्नदाता शेतकरी आहे. त्याच्या अंगावर गाडी घालून हत्या करण्याची दुर्दैवी घटना घडली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यामुळे देशातल्या जनतेला जागं करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी देखील महाराष्ट्र बंदमध्ये सर्व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे असे आवाहन केलं असल्याचे संजय राऊतांनी म्हटलं आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी देखील महाराष्ट्रासह देशात ज्या ज्या राज्यात विरोधी पक्षांचे सरकार आहे. तिकडे बंद पुकारण्यात यावा असे आवाहन करण्यात आले असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच निर्घृण कृतीला आळा बसणार नाही. अन्नदाता शेतकरी एकाकी नाही हे दाखवण्याची वेळ आहे. म्हणून सांगू इच्छितो की, काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेना पुर्ण ताकदीने या बंदमध्ये सहभागी असेल. मुख्यमंत्र्यांनी आणि शरद पवारांनी बंद बाबत भूमिका जाहीर केल्यामुळे लोकं स्वयंस्फुर्तीने बंद पाळतील असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांना खलिस्तानी, देशद्रोही म्हटलं जातंय – राष्ट्रवादी
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, उत्तरप्रदेशमधील लखीमपुरच्या आंदोलनकारी शेतकऱ्यांवर केंद्रीय मंत्र्या्च्या मुलाने गाडी चढवली त्याच्यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. एवढा मोठा नरसंहार झाला तरी पोलीस गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. माहिती मिळाली की केंद्रीय मंत्रीचा मुलगा पळून गेला. पवारांनी सांगितले की, जालियनवाला बागनंतर अशी घटना देशात घडली आहे. भाजप शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वर्ष झालं तरी संवाद साधत नाही. कधी शेतकऱ्यांना खलिस्तानी, देशद्रोही सांगण्यात येत आहे. त्यांच्या रस्त्यात खिळे लावण्यात येत आहेत. लखीमपुर घटनेनंतर भाजप शेतकऱ्यांच्या पक्ष नाही शेतमालांचा लूट करणारा पक्ष आहे. आता शेतकऱ्यांचा हत्या करणारे हा पक्ष आहे.
अत्यावश्यक सेवा सुरु राहतील
महाराष्ट्र बंद शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून सुरु होईल. महाराष्ट्र बंद ठेवण्यासाठी तिन्ही पक्षातील कार्यकर्ते लोकांना हात जोडून विनंती करतील. ठिकठिकाणी सर्व कार्यकर्ते लोकांना जाऊन सांगतील की सरकारविरोधात शेतकऱ्यांच्या आपण पाठीशी आहोत. त्यासाठी लोकांना विनंती करतील आणि १२ नंतर रात्री बंदला सुरुवात होईल आणि या बंदनंतर अत्यावश्यक सेवेला बाधा येणार नाही. शिवसेना बंदमध्ये सामील होते तेव्हा निश्चितपणे बंद यशस्वी होईल आणि देशाला चांगला संदेश जाईल असेही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. अत्यावश्यक सेवा सुरु राहील अशी भूमिका महाविकास आघाडीची आहे. अत्यावश्यक सेवेत मेडिकल स्टोर, रुग्णवाहिका, हॉस्पिटल, दूध वाहतूक अशा अनेक सेवांना कुठल्याही प्रकारे बाधा येणार नाही.
देशात हुकुमशाही – सचिन सावंत
लखीमपुरमध्ये शेतकरी शांततापुर्ण आंदोलन करत होते. त्या शेतकऱ्यांच्या अंगावर जीप घालून चिरडलं ही घटना मानवतेला कलंक लावणारी आहे. आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न आहे. तो प्रकार भारतीय लोकशाहीला कलंकीत करणारा आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशपातळीवर ज्या पद्धतीने प्रियांका गांधी, राहुल गांधींना आडवण्यात आले. देशात हुकुमशाही आली आहे. कामगारांवर अत्याचार होत आहे. देशातील संविधानिक संस्था मोडीस काढण्यात येत आहेत. विरोधकांवर दमनशाही अवलंबली जात आहे. यंत्रणांचा गैरवापर करत आहेत असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : Cruise Drug Bust: पार्थ पवारांच्या क्रूझ पार्टीतल्या सहभागावर NCB मोठा खुलासा