राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने आज दुसरा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2021) सादर केला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडत कोरोना आणि लॉकडाउनमुळे राज्यासमोर आर्थिक आव्हान उभी असताना देखील मुंबईवर अधिक प्रमाणावर भर दिला आहे. यामध्ये विशेष म्हणजे मुंबईतील कोस्टल मार्ग २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यामध्ये मेट्रो मार्ग २ अ, ७ चे काम २०२१ पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर शिवडी-न्हावाशेवा प्रकल्प २०२२ला पूर्ण करणार असल्याचे देखील अर्थसंकल्पात म्हटले गेले आहे. तसेच वरळी ते शिवडी पूलाचे काम ३ वर्षात पूर्ण केले जाणार आहे.
मुंबईतील १४ मेट्रोलाईनकरता १ लाख कोटी खर्च
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत जलमार्गाचा वापर वाढवण्यात येणार आहे. त्यासोबतच मुंबईतील १४ मेट्रोलाईनकरता राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. याकरता १ लाख ४० हजार कोटी खर्च अपेक्षित असणार आहे. त्याचप्रमाणे मेट्रो २ अ, ७ चे काम २०२१ पर्यंत पूर्ण करणार आहे. तर मुंबईतील कोस्टल मार्ग २०२४ पर्यंत पूर्ण केला जाणार आहे. तसेच मुंबईत रेल्वे रुळांवरील सात उड्डाणपूल उभारणार आहेत.
हेही वाचा – Maharashtra Budget 2021: यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी केली मोठी तरतूद