मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.१७) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. मात्र या बैठकीला अर्ध्यापेक्षा अधिक मंत्री या बैठकीसाठी उपस्थित नव्हते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंत्र्यांनी कॅबिनेटसाठी उपस्थित नव्हते.
या बैठकीमध्ये राज्याची अर्थव्यवस्था, शिक्षण, योजना आणि दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, राज्यातील शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करण्याबाबत चर्चा देखील करण्यात आली. यासह अन्य काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील घेण्यात आले आहेत.
राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. विद्यापीठांवरील भार कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक शक्तीशाली जाळे तयार होऊन विद्यार्थ्यांना अधिक संधी प्राप्त होतील. राज्यपाल हे कुलपती या नात्याने या समूह विद्यापीठांच्या कुलगुरुंची नियुक्ती करतील. ही विद्यापीठे सार्वजनिक विद्यापीठे राहणार आहेत.
राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानात अशा प्रकारे चांगल्या शैक्षणिक संस्थांचे समूह विद्यापीठांमध्ये रुपांतर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. राज्यात डॉ.होमीभाभा राज्य विद्यापीठ, मुंबई, हैद्राबाद सिंध नॅशनल कॉलिजिएट विद्यापीठ,मुंबई, कर्मवीर भाऊराव पाटील, सातारा अशी 3 समूह विद्यापीठे आहेत.
समूह विद्यापीठासाठी इच्छुक असणारे प्रमुख महाविद्यालय शैक्षणिकदृष्ट्या उच्च कामगिरी करणारे, आवश्यक ती पायाभूत सुविधा, प्रशिक्षित आध्यापक तसेच समुह विद्यापीठाच्या दृष्टीने समन्वय करण्यासाठी सक्षम असणारे महाविद्यालय किंवा संस्था असावी. समुह विद्यापीठ तयार करण्यासाठी एकाच व्यवस्थापन किंवा शैक्षणिक संस्थेच्या किमान दोन व कमाल पाच अनुदानित किंवा विना अनुदानित महाविद्यालयाचे एकत्रिकरण करणे आवश्यक राहील. कृषी व आरोग्य विज्ञान वगळता इतर सर्व पारंपरिक व व्यवसायीक महाविद्यालये समूह विद्यापीठात समाविष्ट होऊ शकतील. पाच पेक्षा जास्त महाविद्यालये किंवा संस्था समूह विद्यापीठात समाविष्ट करण्यासाठी राज्य शासन मुल्यांकन करेल.
समुह विद्यापीठातील प्रमुख महाविद्यालय मागील 20 वर्षांपासून कार्यरत असावे. तसेच या महाविद्यालयात किमान 2 हजार विद्यार्थी असावेत तसेच ही संख्या मिळून सहभागी महाविद्यालयांमध्ये किमान 4 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी आवश्यक आहे. या महाविद्यालयांकडे एकत्रितपणे 15 हजार चौ.मी. इतके एकत्रित बांधकाम आवश्यक असून विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी 4 हेक्टर जागा आणि राज्यातील उर्वरित भागासाठी 6 हेक्टर जागा असावी.
प्रमुख महाविद्यालय हे किमान 5 वर्षांपासून स्वायत्त दर्जा प्राप्त असलेले असावे किंवा या महाविद्यालयास नॅकचे किमान 3.25 सीजीपीए मानांकन किंवा समतुल्या एनबीए गुण असणे आवश्यक आहे किंवा एकूण अभ्यासक्रमांपैकी 50 टक्के अभ्यासक्रम एनबीए द्धारा मान्यताप्राप्त असावे. याशिवाय इतरही काही आवश्यक बाबी या मार्गदर्शक तत्वात नमूद करण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठाचे कामकाज व्यवस्थित चालविण्यासाठी कुलगुरू आणि कुलसचिव यांच्यासह 7 पदे निर्माण करण्यात येतील. यासाठी राज्य शासनाकडून 1 कोटी रुपये अशी रक्कम पहिल्या 5 वर्षांकरिता विद्यापीठाला देण्यात येईल.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय…
मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. 1345 हेक्टर क्षेत्र सिंचित होणार ( जलसंपदा विभाग)
राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ ( ग्रामविकास विभाग)
आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता ( उच्च व तंत्रशिक्षण)
राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण.
1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी ( नियोजन विभाग)
कॅबिनेटसाठी गैरहजर असलेले मंत्री
छगन भुजबळ
अदिती तटकरे
हसन मुश्रीफ
अनिल पाटील
अब्दुल सत्तार
संजय राठोड
शंभूराज देसाई
उदय सामंत
अतुल सावे
सुरेश खाडे
राधाकृष्ण विखे पाटील
रवींद्र चव्हाण
धर्मरावबाबा आत्राम
संजय कुमार बनसोडे
संदीपान भुमरे
गुलाबराव पाटील
कॅबिनेटला हजर असलेले मंत्री
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
अजित पवार
दिलीप वळसे पाटील
धनंजय मुंडे
दादा भुसे
तानाजी सावंत
विजयकुमार गावीत
चंद्रकांत पाटील
दीपक केसरकर
मंगलप्रभात लोढा
सुधीर मुनगंटीवार