लोकसभेत काँग्रेसकडून महाराष्ट्रातील प्रश्नांची बाजू मांडणारे खासदार बाळू धानोरकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर खासदार बाळु धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अखेर आज बाळू धानोरकर यांनी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. (Maharashtra Congress MP Balu Dhanorkar passes away)
शुक्रवार २६ मे रोजी त्यांना नागपुरात किडनी स्टोनच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुंतागुंत वाढल्याने त्यांना तातडीने दिल्लीच्या मेदांता हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले. मात्र मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिल्या आहेत.
(हेही वाचा – Balu Dhanorkar Political Journey : कोण आहेत खासदार बाळू धानोरकर?)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
“बाळू धानोरकर हे चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास असलेले नेतृत्व, युवा नेतृत्व, बहुजन नेतृत्व होते. बाळू धानोरकर यांचे निधन ही आमच्यासाठी अतिशय धक्कादायक बातमी आहे. कमी वयात त्यांचा मृत्यू होणं हे आमच्यासाठी आणि धानोरकर कुटुंबासाठी मोठी दुख:ची घटना आहे. जनसामान्यांचे प्रश्न घेऊन पोटतिडकीने लढणारे हे नेते होते. जीवाची बाजी लावणारे नेते होते. एखादे काम हाती घेतले की ते पूर्ण केल्याशिवाय राहायचे नाही. त्यांच्या निधनानंतर लोकप्रियतेची जाणीव होत आहे. या घटनेतून बाहेर येणे आमच्यासाठी कठीण आहे”, असे नाना पटोले म्हणाले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रपूरचे तरुण खासदार आणि माझे जिवलग मित्र श्री. बाळू धानोरकर यांच्या अकस्मात निधनाने एक लढवय्या लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी सतत जागरूक असणारे आणि प्रसंगी त्यासाठी आक्रमक होणारे धानोरकर हे असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते.
हा तरुण लोकनेता आता… pic.twitter.com/a4kCcTSBby
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) May 30, 2023
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार
“चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. चंद्रपूरच्या जनतेशी एकरुप झालेलं नेतृत्व, धडाडीचे लोकप्रतिनिधी, कर्तव्यनिष्ठ लोकसेवक अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं तरुण नेतृत्व आपण गमावले आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची, महाविकास आघाडीची मोठी हानी झाली आहे. दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांच्या कुटुंबियांच्या, सहकाऱ्यांच्या, कार्यकर्त्यांच्या दु:खात आम्ही सर्वजण सहभागी असून मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो”, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
काँग्रेसचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचं अचानक आजारी पडणं, अत्यवस्थ होणं आणि दोन दिवसांत त्यांच्या निधनाचे वृत्त येणं, हे सारं अकल्पनीय, अविश्वसनीय व धक्कादायक आहे. राजकीय कारकिर्द बहरास येत असताना ऐन उमेदीच्या काळात त्यांचं अकाली निधन प्रत्येकाला अस्वस्थ करणारं आहे.
खा. बाळूभाऊ… pic.twitter.com/XfQ2f6SmWw— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 30, 2023
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाड
चंद्रपूर वर्णी अर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार,काँग्रेस नेते श्री.बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक आहे.धानोरकर परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
दिवंगत बाळुभाऊ धानोरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/jsVh2E7S5Z— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 30, 2023
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
संसदेतील माझे सहकारी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय दु:ख झाले. बाळू धानोरकर यांचे अकाली निधन ही राज्याच्या राजकीय क्षेत्राची मोठी हानी आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो. ॐ शांती.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) May 30, 2023
माजी मंत्री बाळासाहेब थोरात
“बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सर्वसामान्य माणूस ते आमदार आणि खासदार होण्याचा प्रवास प्रेरणादायी होता. ते आमदार असताना माझा त्यांच्याशी परिचय झाला. त्यांच्या मतदारसंघात मोठी लोकप्रियता मिळवली होती”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.
माजी मंख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
“सकाळीच बाळू धानोरकर यांच्या निधनाची बातमी आली आणि धक्का बसला. त्यांचा फार वय नव्हतं. हा काँग्रेस आणि महाराष्ट्राकरता मोठा धक्का आहे. 2019 च्या अत्यंत संघर्षमय आणि अटीतटीच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात दु:खाची छाया पसरली आहे. मी त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करुन त्यांना दु:ख पचवण्याची ताकद देवो, अशी प्रार्थना करतो”, असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला.
किशोर जोरगेवार
अतिशय दु:खद घटना आहे. धडाडीचा, हिंमतवान लोकप्रतिनिधी म्हणून ओळख होती. मोठमोठे निर्णय सहजपणे करत होते. त्यांच्या कुटुंबावर मोठं दु:ख कोसळलं आहे. धानोरकर यांच्या आत्म्यास शांती मिळो, अशी प्रार्थना करतो, अशी प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.
सुनील केदार
अत्यंत दुःखदायक घटना आहे. काँग्रेसचे नुकसान झालं आहे. बाळू धानोरकर म्हणजे बहुजन समाजाला घेऊन जाणारं नेतृत्व होते. महाराष्ट्रात मोदी लाटेला थांबवणारा एकमेव नेता म्हणजे बाळू धानोरकर. कोणताही राजकीय वारसा नसताना त्यांनी आपला नेतृत्व उभे केला होता. खूप कमी वयात लोकप्रिय झाले होते. 15 दिवसापूर्वी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला भेटायला गेलो होतो. त्यावेळी गप्पा मारल्या होत्या. पाहून वाटले नव्हते की ते आजारी आहे, अशी प्रतिक्रिया सुनील केदार यांनी दिली.
विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
“खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाची बातमी ही दुःखद आहे. त्यांच्या निधनाने समाजाने एक हाडामासाचा, तळागाळातील कार्यकर्ता व नेता गमावला आहे”, अशा प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.