महाराष्ट्र मेडिकल काउंसिल ऑनलाईन कार्यशाळेचे उद्घाटन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी मुख्यमंत्री यांनी व्हिसीच्या माध्यमातून संवाद साधला. यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांना आणि लोकांना कोरोनाच्या काळात औषधांचा अतिरेक वापर करू नका असा सल्ला दिला. रोगापेक्षा इलाज भयंकर असे होता कामा नये. पावसाळ्यात अधिक खबरदारी घ्यावी लागले. कारण म्युकरमायकोसिस प्रमाणे पावसाळा सुरू झाल्यावर इतर बॅक्टेरिया येणार, व्हायरस येणार. त्यामुळे याच्यावर उपचार करताना काय सावधानगिरी बाळगायला हवी. हे लक्षात घेऊन तुम्हाला त्याप्रमाणे उपचार पद्धती अवलंबावी लागणार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी उपस्थितीत डॉक्टरांना सांगितले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, अनावश्यक असूनही काही रुग्ण हॉस्पिटलमध्ये जातात आणि काही वेळेला आवश्यक असून रुग्ण हॉस्पिटलमध्ये उशिरा दाखल होतात. यामुळे रुग्ण दगावतो. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशा प्रकारचे आहे. तुम्हाला हेच ओळखता आले पाहिजे. अनावश्यकपणे औषधांचा अतिरेक वापर केला जातोय, ही एक मोठी डोके दुखी आहे. त्यामुळे डॉक्टरांनी आणि लोकांनी कोविडच्या काळात औषधांचा अतिरेक वापर करू नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला. पुढे ते म्हणाले की, म्युकरमायकोसिसच्या रुग्णाच्या शरीरातील साखरचे प्रमाण वाढले असताना जास्त काळासाठी स्टिरॉईड देणे आणि इतर काही औषध देणे, हे टाळले गेले पाहिजे. म्हणजेच रोगापेक्षा इलाज भयंकर या गोष्टी होता कामा नये. काही जण घराच्या घरी अंगावर काढत आहेत. तर ते करू नका. रुग्णाला कोविड झाल्याचे वेळेत सांगणे गरजेचे आहे. तुला कोरोना झालेला आहे, जर तुला घरी राहणे शक्य असेल तर वेगळा राहा. माझ्या गाईडलाईन प्रमाणे औषधे घे. नाहीतर तू तुझा कोविड कुटुंबियांना देऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगा.
‘म्युकरमायकोसिस प्रमाणे पावसाळा सुरू झाल्यावर इतर बॅक्टेरिया येणार, व्हायरस येणार याच्यावर उपचार करताना काय सावधानगिरी बाळगायला हवी हे तुम्ही लक्षात घेऊन तुम्हाला त्याप्रमाणे उपचार पद्धती अवलंबावी लागणार आहे,’ असे डॉक्टरांना यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले की, आतापर्यंत आपण पाहतोय की, जो व्यक्ती सहव्याधी आहे, त्याच्यावर विषाणूचा घातक परिणाम होतो. हे लक्षात घेऊन कोरोनावरील औषध येत आहेत. काही येऊ घातली आहेत, काही आली आहेत. कोविडचा रुग्ण वेळेत ओळखला पाहिजे, त्याच्यापासून त्याचे कुटुंब वाचवले पाहिजे. कोरोनाचा प्रसार त्याच्या कुटुंबियांना होता कामा नये. दुसऱ्या लाटेत तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात संसर्ग दिसतोय तर तिसऱ्या लाटेत बालके संसर्गग्रस्त होऊ शकतात असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यादृष्टीने अधिक सावधानता बाळगली पाहिजे असेही सांगितले.
‘माझा डॉक्टर’ म्हणून आपल्यावर रुग्णांचा विश्वास
आपण “माझा डॉक्टर” या संकल्पनेतून सातत्याने राज्यभरातील डॉक्टर्सशी संवाद साधत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, सर्वसामान्य रुग्ण पहिल्यांदा त्याला कोणताही त्रास झाला की आपल्या फॅमिली डॉक्टरकडे तपासणीसाठी जातो, हे लक्षात घेऊन त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. कोविड्ची लक्षणे फसवी आहेत. बहुतांश जणांना लक्षणेही दिसत नाही अशा वेळी तुमच्यावर योग्य रीतीने अशा रुग्णास ओळखण्याची जबाबदारी आहे. विशेषत: प्राथमिक आणि मध्यम अवस्थेतील आणि ज्याला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही असा रुग्ण घरीच व्यवस्थित उपचार घेत आहे किंवा नाही ते आपण पहfले पाहिजे. त्याला कधी रुग्णालयात हलविणे आवश्यक आहे त्याकडेही डॉक्टर्सनी काळजीपूर्वक पाहिले पाहिजे.
लसीकरण नोंदी अद्ययावत ठेवा
कोविडसंदर्भात लक्षणांत बदल, दिल्या जाणाऱ्या लसी, लस घेणाऱ्यास असलेल्या सहव्याधी, शरीरात तयार होणारी प्रतीरोधक शक्ती याविषयी व्यवस्थित नोंद होणे गरजेचे आहे. राज्य सरकार प्रथमपासून आकडेवारीत कोणतीही लपवाछपवी करीत नाही. त्यामुळे लसीकरणविषयक वरीलप्रमाणे सर्व नोंदी अद्ययावतपणे करीत गेल्यास पुढे चालून अचूक विश्लेषण करणे शक्य होईल व त्याचा फायदा भविष्यात होईल असेही मुख्यमंत्र्यांनी सुचविले.
विविध विषयांवर विस्तृत चर्चा
दोन दिवसीय कार्यशाळेत एकूणच कोविडसंसर्गाचे बदलते स्वरूप, गृह विलगीकरण रुग्णांवरील उपचार, मुलांमधील संसर्ग, तिसऱ्या लाटेचा अंदाज घेऊन तयारी करणे, कोविड लसीकरण, म्युकरवरील इलाज, कोविड व्यवस्थापनातील मुद्दे, प्रयोगशाळेतील चाचण्या, कोविडनंतरचे आजार अश विविध विषयांवर दोन दिवस ही कार्यशाळा चालणार असून टास्क फोर्समधील तज्ञ तसेच इतरही काही तज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करणार आहेत.
हेही वाचा – परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर पंचवटी पोलिसांत गुन्हा