महाराष्ट्रात पुन्हा कोरोना फोफावतो आहे. गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे. गेल्या २४ तासात कोरोनाबाधितांची संख्या दीड हजाराने वाढली आहे. १ हजार ४९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १ रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे पुन्हा राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका अलर्ट मोडवर आहे. कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून कोविड सेंटरसुद्धा पुन्हा सुरु करण्यात आले आहेत.
राज्यात गेल्या २४ तासात १ हजार ४९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना बरे होणाऱ्यांची संख्यासुद्धा जास्त राहिली आहे. २४ तासात ६१४ कोरोना रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राज्यात ९८.०४ टक्के आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ७७ लाख ३८ हजार ५६४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात आतापर्यंत ७८ लाख ९३ हजार १९७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १४७८६६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्यने वाढ होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. दरम्यान मास्क सक्तीबाबतही सूचक प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये मास्क सक्ती होऊ शकते. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर मास्क सक्ती होऊ शकते.
गेल्या २४ तसात मुंबईमध्ये ९६१ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ठाण्यात २८ आणि ठाणे मनपा क्षेत्रात १०८ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सर्वाधिक कोरोना रुग्ण ठाणे, मुंबई, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यात सापडत आहेत. आज सर्वाधिक ठाणे मंडळातून १ हजार ३६२ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.
हेही वाचा : Corona Virus : मास्क सक्ती नाही तर मास्क वापरण्यासाठी आवाहन करतोय : अजित पवार