राज्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी राज्याच १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून पुढील पंधरा दिवसांसाठी कडक निर्बंध करण्यात आले आहेत. राज्यात आज कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांच्या घरात पोहचली आहे. राज्यात ६० हजार २१२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २८१ जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर हा १.६६ टक्के इतका झाला आहे. राज्यात आज ३१ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे आतापर्यंत राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही २८ लाख ६६ हजार ९७ इतकी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर हा ८१.४४ टक्के इतका झाला आहे.
राज्यात आतापर्यंत २ कोटी २५ लाख ६० हजार ५१ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील ३५ लाख १९ हजार २०८ कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर राज्यात सध्या ३२ लाख ९४ हजार ३९८ लोक होमक्वारंटाईन आहेत. तर३० हजार ३९९ लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात सध्या ५ लाख ९३ हजार ४२ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात १५ दिवसांची संचारबंदी
राज्यात वाढणाऱ्या कोरोनाच्या परिस्थितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून राज्यात कलम १४४ लागू केला आहे. त्याचप्रमाणे पुढील १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली. या संचारबंदीच लोकल सेवा, वाहतूक सेवा सुरु राहणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी घराबाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील गोर गरिबांचे हाल होऊ नयेत यासाठी अनेक सोयीही करण्यात आल्या आहेत. योग्य कारण असल्यास घराबाहेर पडा त्याचप्रमाणे अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्याचप्रमाणे ही लढाई जिंकण्यासाठी सर्व जनतेनी सहकार्य करण्याचे आवाहनही केले.
हेही वाचा – Maharashtra Lockdown: लोकल सेवा राहणार सुरु; पण केवळ अत्यावश्यक सेवांसाठीच!