कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आला. आता १ जूनपर्यंत ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू असणार आहे. पण या ‘ब्रेक दे चेन’ मोहीमेचा असर राज्यात काही दिवसांपासून चांगला पडताना दिसत आहे. राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यात गेल्या २४ तासांत २२ हजार १२२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४२ हजार ३२० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३६१ रुग्णांच्या मृत्यू नोंद झाली आहे. सध्या राज्यात ३ लाख २७ हजार ५८० सक्रिय रुग्ण आहेत.
आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५६ लाख २ हजार १९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८९ हजार २१२ रुग्ण मृत्यूमुखी पडले असून ५१ लाख ८२ हजार ५९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.५१% एवढे झाले आहे. तर मृत्यूदर १.५९% एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ३६१ मृत्यूंपैकी २७५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ३२ लाख ७७ हजार २९० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५६ लाख २ हजार १९ (१६.८३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २७ लाख २९ हजार ३०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४ हजार ९३२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.