महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत चढ-उतार सुरूच आहे. सोमवारी मृतांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. मृतांचा आकडा शंभरपेक्षाही कमी होता. परंतु, मंगळवारी मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली. आज राज्यात १४७ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ३० हजार ७५३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५८,४६,१६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,२९,५९६ (१३.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६०,३५४ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ३९७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
बाधितांच्या आकड्यातही किंचित वाढ
मृतांप्रमाणेच कोरोनाबाधितांच्या आकड्यातही किंचित वाढ झाली. सोमवारी राज्यात ६ हजार १७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. तर मंगळवारी ६ हजार ९१० जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ६२ लाख २९ हजार ५९६ झाली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९४ हजार ५९३ इतकी झाली आहे.
७ हजार ५१० रुग्ण कोरोनातून बरे
सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या कमी झालेली दिसली. सोमवारी १३ हजारहून अधिक रुग्ण बरे झाले होते. तर मंगळवारी राज्यात ७ हजार ५१० रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ६०,००,९११ जणांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.३३ टक्के एवढे झाले आहे.