राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासात १० हजार ९७८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या २४ तासात ७ हजार २४३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविरोधातील उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढणाऱ्या ९ जिल्ह्यांमध्ये कोरोना रोखण्यासाठी निर्बंध कडक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णाचा शोध घेण्यासाठी कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,४३,८३,११३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६१,७२,६४५ (१३.९१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,७४,४६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,६०७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या एकूण १,०४,४०६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
राज्यात गेल्या २४ तासात ७,२४३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६१,७२,६४५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण १९६ मृत्यूंपैकी १६७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ % एवढा आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समावेश हा तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. यामुळे राज्यात सध्या निर्बंध कायम असून रात्रीची संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.