राज्यात काल, सोमवारी नव्या रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी ६ हजार ७२७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती तर १०१ जणांचा मृत्यू झाला होता. राज्यातील सोमवारीच्या आकडेवारीच्या तुलनेत आज राज्यात नव्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच मृत्यूची संख्या दुप्पटीने वाढली आहे. आज, मंगळवारी राज्यात २४ तासांत ८ हजार ८५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून २३१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६० लाख ५१ हजार ६३३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २१ हजार ८०४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या राज्यात १ लाख १७ हजार ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात २४ तासांत ८ हजार ६२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत एकूण ५८ लाख ९ हजार ५४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०१ टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण २३१ मृत्यूंपैकी १५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ७५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी १३ लाख ९८ हजार ५०१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६० लाख ५१ हजार ६३३ (१४.६२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख २१ हजार ३७७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार ५८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.