कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असतानाच राज्यातील नव्या कोरोनाबाधित संख्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र दिलासाजनक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा आज बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. तर कोरोना मृतांच्या संख्येतही बुधवारच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत ७ हजार २४२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात एकूण १९० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय ११ हजार १२४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊ घरी परतले आहेत.
राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख ९० हजार १५६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत १ लाख ३२ हजार ३३५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा झाला आहे. याशिवाय राज्यात आजपर्यंत एकूण ६० लाख ७५ हजार ८८८ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.५९ टक्क्यांवर पोहचले आहे. राज्यात आज एकूण ७८ हजार ५६२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ७५ लाख ५९ हजार ९३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ९० हजार १५६ (१३.२३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ८७ हजार ७०४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ३ हजार २४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.