राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसांपासून स्थिर आहे. मागील तीन दिवसांपासून बरे होणार्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्यामध्ये शुक्रवारी ६२,९१९ नवीन रुग्णांची नोंद झाली असली तरी तब्बल ६९,७१० रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३८,६८,९७६ वर पोहोचली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.०६ टक्के एवढे झाले आहे. राज्यामध्ये शुक्रवारी ६२,९१९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, बाधित रुग्णांची संख्या ४६,०२,४७२ इतकी, तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६,६२,६४० वर पोहोचली आहे.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसांपासून स्थिर असताना मागील तीन दिवसांपासून रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. ३० एप्रिलला राज्यामध्ये ६९,७१० रुग्ण बरे झाले. त्यापूर्वी २९ एप्रिलला ६८,५३७ आणि २८ एप्रिलला ६१,१८१ रुग्ण बरे झाले आहेत. मात्र, या तीन दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत घट झालेली पाहायला मिळाली आहे. राज्यात शुक्रवारी ८२८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ६८८१३ वर पोहोचली आहे. राज्यातील मृत्यूदर १.५ टक्के एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७१,०६,२८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४६,०२,४७२ (१७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१,९३,६८६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २६,४६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.