कोरोना रुग्णांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. राज्यात सोमवारपासून मिनी लॉकडाऊन सुरुवात झाली. तर शुक्रवार रात्रीपासून ते सोमवार सकाळपर्यंत वीकेंड लॉकडाऊन होता. राज्यात ३० एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन आणि वीकेंड लॉकडाऊन असणार आहे. पण हाच वीकेंड लॉकडाऊन असरदार असल्याचे चित्र काहीसे दिसत आहे. राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. काल राज्यात ६० हजारांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. पण आज राज्यात आज १० हजारांहून अधिक रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५१ हजार ७५१ नवीन रुग्ण आढळले असून २५८ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३४ लाख ५८ हजार ९९६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ५८ हजार २४५ जणांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरात ५२ हजार ३१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत राज्यात आजपर्यंत एकूण २८ लाख ३४ हजार ४७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.९४ एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.६८% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी २३ लाख २२ हजार ३९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३४ लाख ५८ हजार ९९६ (१५.४९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३२ लाख ७५ हजार २२४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९ हजार ३९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आता ५ लाख ६४ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाबाधितांच्या संख्येत महाराष्ट्राने स्पेनला केलं स्क्रोस
महाराष्ट्राने कोरोनाबाधितांच्या संख्येत स्पेनला मागे टाकून जागतिक यादीत ९व्या स्थानावर झेप घेतली आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, स्पेनमधील कोरोनाबाधितांची संख्या ३३ लाख ४७ हजार ५१२वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७६ हजार ३२८ जणांचा मृत्यू झाला असून ३० लाख ९५ हजार ९२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
हेही वाचा – अखेर राज्यात Remdesivir वरच्या किरकोळ विक्रीवर बंदी