राज्यातील कोरोना रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. हजारोंच्या घरात गेलेली राज्यातील रुग्णसंख्या आज दीडशेवर येऊन पोहचली आहे. त्यामुळे कोरोना महामारी नियंत्रणात आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येतही आज कालच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. तर मृतांची संख्या केवळ 1 आहे. त्यामुळे मुंबईपाठोपाठ राज्य देखील कोरोनाच्या विळख्यातून हळूहळू बाहेर येत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासात 158 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 298 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 98.09 टक्के झाले आहे.
सध्या राज्यात 2 हजार 382 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 78,71,359 झाली आहे. तर कोरोनातू बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 77 लाख 21 हजार 220 झाली आहे. याशिवाय मृतांची एकूण संख्या 1 लाख 43 हजार 753 झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 7 कोटी 86 लाख 83 हजार 002 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78 लाख 71 हजार 359 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण 10.00 टक्के इतके आहे.